संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश
जेव्हा आरोपींनी एकत्रितपणे मिळून दोन किंवा अधिक गुन्हे केले असतील, तेव्हा हे कलम लावण्याची परवानगी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते.



पोलीस तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यामध्ये टोळीप्रमुख अक्षय दादा चव्हाण (वय २१, रा. अकोले नाका, संगमनेर), रोहित उर्फ कोकण भिकाजी शिंदे (वय २५, रा. अकोले नाका, संगमनेर), संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २५, रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), आदित्य संजय शिंदे (वय २१, रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), अभिषेक अशोक लोंढे (वय २२, रा. अकोले नाका, संगमनेर) आणि साई रामपुरी गोसावी (वय २४, रा. अकोले नाका, संगमनेर) यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या चार आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्यांचे गुन्हेगारी अभिलेख तपासण्यात आले आहेत.
या गुन्हेगारांच्या सातत्यपूर्ण कृत्यांमुळे संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी या टोळीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पाठवला होता. वाघचौरे यांनी या प्रस्तावाचे सखोल अवलोकन करून, आरोपींनी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये केल्याचे स्पष्ट झाल्याने या वाढीव कलमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.