संगमनेर – महिला भगिनींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या महिला भगिनींवर एकलपणाचे दुःख आले, त्या सर्वांना आधार देत त्यांना आदर व सन्मान देण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी केले.
स्वर्गीय नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर खुर्दमध्ये श्रीमती रोहिणी गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होत्या. रोहिणी गुंजाळ यांच्यासह सरपंच श्वेता मंडलीक, जयश्री शिंदे, रोहिणी कदम, स्वाती गोसावी, दिपाली गडगे, श्रीमती पवार मॅडम यांच्यासह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या.
थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. हाच वारसा पुरोगामी महाराष्ट्र पुढे जपत असून एकल महिलांना सर्वांनी नेहमी सन्मान द्यावा. दुर्दैवाने त्यांच्यावर एकलपणा आला. त्यांना सर्व समारंभात सहभागी करून घ्या. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता मानवता जपा. वारकरी संप्रदायाने सर्वधर्मसमभाव व समतेचा मंत्र दिला आहे. पुरोगामी विचारांमध्येही अंधश्रद्धेला थारा नाही. हाच विचार संगमनेर तालुक्यात जोपासला जात असून नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने महिला सबलीकरणासाठी आयोजित केले जाणारे उपक्रम स्तुत्य आहे.
रोहिणी गुंजाळ म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कांचनताई थोरात व दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने महिला सबलीकरणाचे काम होत आहे. एकल महिलेला मोठे दुःख असून त्यांना प्रत्येकाने आधार द्यावा. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्याव. यासाठी जनजागृती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


