संगमनेर – समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच आदर्श लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे अभिवादन जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी होते.
तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव, लोकशाही, गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली. बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे रक्षण केले. त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अभ्यासले जात असून ते सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे ते म्हणाले.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. लोक कल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर सन्मान केला. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया, लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला. लोकशाहीचे तत्व त्यांनी जगाला दिले. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्फूर्ती देत असून मार्ग दाखवत असल्याचेही त्या म्हणाल्या.

संगमनेरात विविध ठिकाणी शिवजयंती
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे तर नगरपालिका तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

