अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं.
अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू, असं म्हणून बाबांनी परिस्थिती सांभाळुन घेतली.
घरी येताना सर्व शांत होते. अजय व आई खूप डिस्टर्ब आहे हे बाबांच्या लक्षात आले. घरी आल्यावर बाबा म्हणाले, अरे तुम्ही वेगळे राहिला तर आम्हाला काही हरकत नाही. जवळ राहिलं म्हणजेच प्रेम असत का? अनिता चांगली मुलगी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना मागच्या पाच वर्षांपासून ओळखता. चांगली शिकलेली आहे. दिसायला सुंदर आहे, मुख्य म्हणजे तुला आवडते ना. मग आम्हाला काही हरकत नाही. आजी मात्र नाखुश होत्या. त्यांनी एकुलत्या एक सुनेबद्दल बघीतलेली सर्व स्वप्न एका क्षणात संपल्यासारखी त्यांना वाटलं. अजय फक्त ऐकत होता.
दुसऱ्यां दिवशी अजयने अनिताला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. बाबां मात्र आईला समजविण्यात यशस्वी झाले. मुलांच्या सुखासाठी व आनंदासाठी आई-वडील नेहमीच कोणतेही निर्णय लवकर घेतात. कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते लगेच तयारी दाखवतात.
आता अजय-अनिताचा संसार सुरू झाला. आई बाबांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या घरातील सर्व सामान अनिताच्या पसंतीने घेतले. अगदी चमच्यापासून फ्रीजपर्यंत सर्व वस्तू घरात तयार होत्या.
दोघांची नोकरी होती. अजय आठवड्यातून एकदा घरी यायचा. येताना फोन करून विचारून पिशव्या भरभरून तो आई-बाबांकरिता त्यांची औषधे, फळ, भाज्या आणून देत असे. बाबा म्हणायचे, अरे, मग मी काय करू? आम्हाला बाहेर जायचे कारणच मिळत नाही.
तेंव्हा अजय हसून म्हणत, बाबा तुम्ही फक्त आईला घेऊन फिरायला जात जा. अनिता मात्र काही खास कारण असेल तरच यायची. आईला त्याचे खूप वाईट वाटत असे. बाबांना याची जाणीव होती. ते खंबीर होते. बायकोला सांभाळायची जबाबदारी पण माझीच आहे. हेही बाबांना माहीत होते. बाबा म्हणजे एक प्रसन्न चित्त व्यक्तिमत्त्व. नेहमीच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या जवळ. आणि आपली आयडिया कशी छान आहे हे त्यांना पटवून पण देता येत.
दोघांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. वरवरून आई खूष आहेत, असं दाखवत जरी असल्या तरी कुठे तरी त्यांचे मन दुखावले होते. अजय आज येणार हे कळलं की आई अगदी तयारीला लागायच्या. बाबा लिस्ट घेऊन आईंनी सांगितलेले सर्व साहित्य आणून द्यायचे. आई वेगवेगळे पदार्थ तर करायच्याच. बरोबर त्यादिवशीचा डबा म्हणून दोन तीन भाज्या, पोळ्या पण द्यायच्या. अरे, तेवढंच अनिताला काम कमी होईल. असं म्हणायच्या. नोकरी करुन घरातील सर्व काम करताना ती थकत असेल असं म्हणत.
अनिता मात्र आपल्या विश्वात अगदी दंग होती, रमलेली होती. आता तर प्रोजेक्ट लीडर होती. त्यामुळे आनंदात होती. पण वाढत्या कामाबरोबरच तिचा स्ट्रेसही वाढत होता.
कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कधी कधी काही कार्यक्रम आयोजित होत असतात. आजचा कार्यक्रम ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’वर होता. अनिता या कार्यक्रमात सहभागी झाली. वक्ता अर्थातच तयारीने आलेला होता. ‘what is stress?’ त्यांचे शारीरिक व मानसिक कसे परिणाम होतात. stress management करिता काय काय आपण करू शकतो? त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. योगा करणे नियमित व्यायाम करणे का गरजेचे आहे हे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितले.
आपले भाषण संपवताना ते म्हणाले, तुम्ही सर्व शिकलेले तरूण आहात. पैसा, पद, बढती फक्त याचाच विचार करू नका? कुठे तरी फुल स्टॉप लावायला शिका. कुठे थांबायचे? हे ठरवायला शिका. आनंद केंव्हा घेणार आयुष्यात? आनंद घेणे ही वर्तमान काळातील गोष्ट असते. भविष्यात घेऊ म्हणून पूढे ढकलायची गोष्ट नव्हे.
आपल्या जीवनात प्राधान्यक्रम ठरवायला शिका. पैसा आणि फॅमिली हे दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. फ्रीडम, प्रायव्हसीच्या नावाखाली आपण आपल्या माणसांपासून दूर तर होत नाही ना याचेही भान ठेवा. एकटेपणा हे सुद्धा स्ट्रेसचे एक मोठे कारण आहे. जेंव्हा व्यक्त व्हायला कोणी विश्वासाचे मिळत नाही, तेंव्हा स्ट्रेस एकत्र होत जातो. तुमच्या या नवीन कल्चरमधे नोकरी सोडणे, बदलणे किंवा नोकरी जाणे, या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत.
त्यामुळे अस्थिरता व अनिश्चितता या दोन्ही तलवारी सतत टांगलेल्या असतात तुमच्या आयुष्यात. निश्चित काही गोष्ट असेल तर ती तुमची फॅमिली आहे. तो तुमचा आनंद आहे. तेंव्हा विचार करा. तुम्ही त्या सर्वांबरोबर जीवापाड तडजोड करता. जे निश्चित नाही. मग परिवार बरोबर का नाही? ती तर जास्त सोपी व सहज गोष्ट आहे. ओझ आणि मन हलकं करायला परिवारासारखी दुसरी सेफ जागा नसते. तुमचे कौतुक करायला व तुम्हाला, तुमच्या मुलांना सांभाळायलाही कोणी तरी पाहिजेच ना. माझ्या भाषणात हा उल्लेख मी सर्वात शेवटी जरी केला असला, तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा.
अचानक अनिताच्या डोळ्यासमोर अजयच्या आई बाबांचा चेहरा आला. त्यांनी पाठविलेले डबे, वेळोवेळी घेतलेली काळजी तिला आठवली. अनिता घरी आली ती वेगळ्याच विचारात. येताना तिने बाबांना फोन केला. अजयला पण सुट्टी घ्यायला सांगितले. अनिता-अजय उद्या घरी येतायेत. बाबांनी आईंना सांगितले. दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते. मिश्रीत भाव होते. बाबा म्हणाले, अग उद्या अनिताच्या आवडीचा स्वयंपाक कर.
दुसऱ्या दिवशी अजय अनिता घरी आले. अनिताने आई बाबांना सांगितले, आम्ही येथे तुमच्या बरोबर रहायला येणार आहोत नेहमीकरिता. अजय, आई बाबा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. पण यावेळी मिळणारा धक्का सुखद होता.
बाबा म्हणाले… “Yes, you are always welcome.” फक्त मला पंधरा दिवस द्या. तुमची खोली व्यवस्थित करायला. आईने बाबांकडे बघीतले, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व बाबांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.••• .
“दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत”. ‘संयम आणि माफ करायची ताकद मनुष्यात असली की सर्व साध्य होते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा व स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोडी या दोन गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात. “चुकीने चूकीच्या मार्गावर गेले तर काही हरकत नाही. पण चूक लक्षात येताच मार्ग बदलायची इच्छा व हिम्मत दाखविणे हे कौतुकास्पद आहे”.
संध्या बेडेकर ( साभार – समाज माध्यम)

