दि. ११ मार्च, मुंबई
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

सोमवारी या संदर्भात राज्य सरकारच्या गृह विभागाने एसआयटी नेमण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा आणि वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे. मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे या आणि इत्यादी बाबींसंदर्भात चौकशी करून तीन महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
सदर तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे, विशेष तपास पथकासाठी आवश्यक मनुष्यबळ राज्य सरकारच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार समितीचे अध्यक्ष कर्णिक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

