बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर
गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडलेल्या घटनांमुळे संगमनेर पुन्हा एकदा दंगलीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. स्थानिक प्रशासनाला ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यानेच की काय, थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांना संगमनेरमध्ये येऊन पोलीस दलासोबत रूटमार्च काढत प्रशासन सतर्क असल्याचे त्यांना संगमनेरकरांना सांगावे लागते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रूटमार्च काढला असला तरी देखील यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा रूट मार्च काढला नव्हता. एकूण परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणुका, रमजान, शिवजयंती उत्सव अशा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दंगलींमुळे होळपळलेल्या सुज्ञ संगमनेरकरांना शांतता हवी आहे.
यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, व्यापारी, उद्योजक, संगमनेरकर नागरिक आणि विविध पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देत अशांतता निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली. राज्यभर संगमनेरचे कौतुक होत असताना काही प्रवृत्ती मात्र ही शांतता आणि बंधुभाव बिघडविण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका, असे आवाहन देखील लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. एकीकडे संगमनेरकर अशा प्रकारच्या घटना घडविणाऱ्या समाजविघातक व्यक्तींवर कारवाईची मागणी करत असताना संगमनेरात अशांतता नेमकी कोण निर्माण करते याचा शोध प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडेल, शहरात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर देखील प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई केली जात नाही त्यामुळे दोन्ही गटात सातत्याने असंतोषाचे वातावरण राहिले आहे. संगमनेरमध्ये येणाऱ्या सर्वच विभागाच्या शासकीय अधिकारी जर केवळ आपला नोकरीचा कालावधी पूर्ण करण्यासाठीच आपले कर्तव्य बजावणार असतील तर अशा अधिकाऱ्यांचा संगमनेरला काही उपयोग नाही. संगमनेरात शांतता राखणे हे स्थानिकांचे काम असले तरी या शहरात कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी समाज विघातक कृत्य करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता अधिकाऱ्यांनी काम करणे संगमनेरकरांना अपेक्षित आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संगमनेरकरांनी नेहमीच कौतुक केले आहे.
जिल्हा प्रशासनातील अधिकारीच शहरात येऊन ग्राउंडवर स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य बजाऊ लागले तर यात स्थानिक प्रशासनाचे अपयश समोर येते. एखादी घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन प्रशासनाला सूचना करणे, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सूचना करणे अपेक्षित आहे. यामुळे या अधिकाऱ्यांचा धाक जनतेत कायम राहतो.
यापूर्वीच्या ८०-९० च्या दशकातील दंगलींमुळे, जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये संगमनेरकरांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. त्यानंतर सामाजिक सलोखा राखत संगमनेरकरांनी शहर शांत ठेवण्यावर भर दिला. येथील आर्थिक सुबत्ता, बाजारपेठ, शांतता यामुळे बहुतांशी लोक संगमनेरात रहिवास करण्याला प्राधान्य देतात. मधल्या कोरोना काळातील लॉकडाऊनची देखील झळ मोठ्या प्रमाणात बसली असून अद्यापही यातून संगमनेरकर सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा निर्माण झालेल्या या जातीय घटनांमुळे संगमनेरकर भीतीच्या सावटाखाली तणावपूर्ण परिस्थितीला तोंड देत आहे.
अचानकपणे शहरात दिवसेंदिवस पोलीस बंदोबस्तात वाढ केली जात असून पोलिसांचे विविध दल संगमनेरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती असली तरी कोठे काही घडले का? याबाबत संगमनेरकर नागरिक माध्यमांच्या प्रतिनिधींकडे विचारणा करतात. माध्यमांच्या प्रतिनिधींनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर देखील माध्यमांच्या प्रतिनिधींना यासंदर्भात पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना नेमके काय साधायचे असते, असा देखील प्रश्न उपस्थित होतो.
(बातमीतील छायाचित्र : काशिनाथ गोसावी)



