रविवार दि. ३१ मार्च
ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा एनडीएत सहभागी झाले की त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद होतात. हे नेते भाजपच्या ‘वाशिंग मशीन’मधून स्वच्छ होऊन निघतात. महाराष्ट्रासह देशभरात भाजपचे हे ‘वाशिंग मशीन’ जोरात सुरू असल्याचे दिसते. एकेकाळी ज्या नेत्यांवर भाजपने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप केले आता तेच नेते त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले. मात्र त्यांच्या उत्तरामुळे पक्षाची गोची झाली आहे.
‘निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. तुम्ही एकेकाळी ज्या नेत्यांना भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ म्हणून हिणवत होतात ते नेतेच आता भाजपसोबत आहेत. आदर्श घोटाळ्याचे आरोपी अशोक चव्हाण, तसेच तुम्ही ज्यांना तुरुंगात ‘चक्की पिसिंग… चक्की पिसिंग’साठी पाठवणार होते ते ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असणारे अजित पवार आता भाजपच्या विकासाचे आयकॉन झाले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते? असा परखड सवाल ‘टाईम्स नाऊ’ समिट या कार्यक्रमात निर्मला सीतारमण विचारण्यात आला.
याला उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आम्ही त्यांना पक्षात घेत नाही, तर ते आमच्यासोबत येत आहेत. सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे. यावर पत्रकारांनी ‘तुम्ही सर्वांसाठी, मग ते भ्रष्टाचारी असले तरी त्यांच्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकणार का?’, असे विचारले असता, ‘भाजपचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असून आम्ही त्यांचे स्वागत करू’, असे म्हटले. निर्मला सीतारामण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये बघा….
पैसे नसल्याने निवडणूक लढवणार नाही!
निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे नसून ती जिंकण्यासाठी जाती-धर्मासारख्या विषयांचा आधार घेतला जात असल्याने ही निवडणूक आपण लढवणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मला पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी विचारलं होतं. या निवडणुकीसाठी दक्षिण हिंदुस्थानमधील एका जागेचा प्रस्तावही देण्यात आला होता. आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडू यापैकी एका जागेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, दहा दिवस मी विचार केला आणि निवडणूक न लढवण्याचा निश्चय केला, असे त्या म्हणाल्या. (सौजन्य दै. सामना)


