संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले
कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन
मंगळवार, दि. २८ मे
गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो.
मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे गावच्या शिवारात जांभूळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रोखून धरला होता. याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हवालदार राजेंद्र पालवे व दत्तात्रय बडधे घटनास्थळी गेले.
आयशर ट्रक मधून गोमांस वाहतूक केली जात असल्याचा कारणावरून पोलिसांनी जाकीर खान नसीर खान पठाण (वय ४९ वर्षे, रा. मोगलपुरा, संगमनेर) व आयुब मेहबूब कुरेशी (वय ५३ वर्ष, रा. कुरण रोड, इस्लामपुरा, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीसह आयशर ट्रक पोलीस ठाण्यात आणला. पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजेंद्र पालवे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
गोमांस पकडले तेरा टन दाखविले पाच टन … संगमनेरमधील गोवंश कत्तली मागे काही पोलिसांच्या सहभाग असल्याचे आरोप सातत्याने होतात. शहरात होणाऱ्या गोवंश तस्करी नंतर गोमांस वाहनात भरून ते तालुक्याबाहेर काढून देण्याचे काम देखील काही लोक करत असल्याची चर्चा असते. मात्र हा आयशर ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हाती सापडला. ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पाच टन गोमांस असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र ट्रक मधील गोमांसाची विल्हेवाट लावण्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे पुन्हा एकदा वजन करण्यास पोलिसांना भाग पाडले. पडताळणी नंतर ट्रकमध्ये १३ टन गोमांस असल्याचे समोर आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांना पुन्हा सुधारित आकडेवारी दाखवावी लागली.
पोलीस संशयाच्या भोवऱ्यात … दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी ट्रकमध्ये असलेल्या गोमांसाच्या वजनाची खात्री न करताच अंदाजे ५ टन वजन दाखविण्याचा उद्योग कशासाठी आणि कोणासाठी केला हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूळ वजनापेक्षा कमी वजन दाखवून तब्बल आठ टन गोमांस गायब करण्याचा पोलिसांचा नेमका हेतू काय होता? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

