संपादकीय
अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशा वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले “वाकचौरे आता थांबणार नाहीत” हे विधान केवळ एक राजकीय टिप्पणी नसून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारे ठरले आहे.
राजकारणात नेत्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती यालाही अनेक अर्थ असतात. मंगळवारी (२ जून) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना छेडले असता त्यांनी केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दलचे वक्तव्य यामुळे चर्चांना अधिक उधाण आले. खैरे यांच्या एका वाक्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाकचौरे खरोखरच पक्षांतराच्या मार्गावर आहेत का? की ही केवळ राजकीय दबावतंत्राची खेळी आहे? याची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर ही नवीन बाब राहिलेली नाही. सत्तेचे समीकरण, मतदारसंघातील राजकीय गणित आणि वैयक्तिक राजकीय भविष्य आणि सध्याच्या काळात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या मागे लागलेल्या विविध चौकशीच्या राजकीय ईडा पिडा या गोष्टींमुळे नेते अनेकदा नव्या वाटा निवडतात. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे बारकाईने लक्ष असते. वाकचौरे यांच्या बाबतीतही नेमके हेच घडत आहे.


खासदार वाकचौरे यांचा पूर्व इतिहासही पक्षांतराचा राहिला आहे. काँग्रेसच्या परंपरागत असलेल्या व नंतर राखीव झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरे यांनी नंतर काँग्रेस-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे. शिवसेनेत मोठे फूट पडल्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची तसेच ऑपरेशन टायगर मध्ये खासदार वाकचौरे यांचा समावेश असल्याची चर्चा रंगली होती.
मेळाव्यातील अनुपस्थिती नंतर खैरे यांच्या विधानामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आगामी काही दिवसांत तसा वेग घेते आहे, याची उत्सुकता आहे. वाकचौरे यांची पुढील भूमिका, ठाकरे गटाचे प्रयत्न आणि शिंदे गटाची रणनीती यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असतील. परंतु या सर्व घडामोडींमध्ये लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या मतदारांच्या हिताचा विचार प्रथम असणे गरजेचे आहे. राजकारणात चर्चांना आणि अफवांना नेहमीच स्थान असते; परंतु अंतिम निर्णय आणि त्यामागील भूमिका यावरच जनतेचा विश्वास टिकून राहतो. त्यामुळे वाकचौरे प्रकरण हे केवळ एका नेत्याच्या संभाव्य पक्षांतरापुरते मर्यादित नसून, अनेक विरोधी नेत्यांनी सत्ताधारी गटात जाणे पसंत केल्याने सध्या तरी पक्षांतर केलेल्या विरोधी नेत्यांचा सत्ताधारी गट महाराष्ट्रात बघावयास मिळत आहे. यात यात मूळ निष्ठावंत भाजपवाले मोठ्या प्रमाणात दुखावले देखील गेले आहेत. जिल्ह्यातील गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेत विधान परिषदेची उमेदवारी मिळविली आहे. हे राजकीय नाट्य जिल्ह्यात रंगले असतानाच आता वाकचौरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या चर्चेकडे देखील महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय प्रवाहाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाणे अधिक योग्य ठरेल.
