प्रवीण पुरो | मुंबई
गुरुवारी (ता. २५ जुलै) पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असताना हवामान विभागानेही धडकी भरणारी शक्यता वर्तवली आहे. २६ जुलैची आठवण करून देणारा पाऊस आज होत आहे. शुक्रवारी (ता. २६ जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे. या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी
मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तेव्हा संपूर्ण मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी जलमय झाली होती. अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात आले. त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक मुंबईकरांचे संसार उघड्यावर पडले होते.
त्यामुळे जुलै महिन्यात विशेषतः २५ किंवा २६ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडू लागला की, मुंबईकरांना २६ जुलै २००५ ची आठवण येतेच येते. त्यातही आता हवामान विभागानेही पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याने मुंबईकरांना पुन्हा २६ जुलै अनुभवायला तर मिळणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत गुरुवारी पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे दुपारपर्यंत मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले.
कुर्ला, चेंबूर, अंधेरी येथील सखल भागांत पाणी साचले. तर अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर, काही तासांमध्ये मुंबई, उपनगरांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दादर, परळ, कुलाबा परिसरातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही वेळाच्या अंतराने ताशी ६०-७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ६२.५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपासून ते गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत म्हणजेच १२ तासांमध्ये मुलुंडमध्ये २२४.२ मिमी, दिंडोशीमध्ये १८४.२, वर्सोवा १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेच्या लोकल मार्गांवर पाणी साचलेले पाहायला मिळाले. ज्यामुळे आता नागरिकांना गरज असेल तरच त्यांनी घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगडला रेड अलर्ट…
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उल्हास नदीने साडे सतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्याने बदलापूरात एनडीआरएफची ३५ जणांची टीम रवाना करण्यात आली आहे. उल्हासनगरातील पेट्रोल पंपदेखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये राहणारे रहिवासी घरे सोडून सुरक्षित स्थळी गेली आहेत.
पुण्यातही पावसाचा हाहाकार…
पुण्यात पावसाने अगदी कहर केला आहे. पुण्यातील खडकवासला आणि मुळशी धरण संपूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे खुले झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आळंदीला जोडणारा पुल १८ वर्षांनंतर पाण्याखाली गेला आहे. पुण्यातील पूरस्थितीमळे हजारो नागरिक अडकून आहेत. शहरातील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पूणे ही रेल्वे सेवाही रोखण्यात आली आहे. पुण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.
पुण्यात विजेचा शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर लवासा येथे दरड कोसळली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पाऊस असाच कोसळत राहीला तर संत ज्ञानेश्वर माऊलीचे मंदिरात पाणी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भक्ती सोपान पुल देखील पाण्यात गेला आहे. पाऊस इंद्रायणी उगम पावते त्याच ठिकाणी ३७० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, देहू आळंदी भागाला पावसाचा मोठा फटका बसला आहे.


