शनिवार, १० ऑगस्ट
अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची शुक्रवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील तब्बल सात लाख आठ हजार महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी २५ हजार महिलांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे या संकेत मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत. दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास २५ हजार अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून या सर्वांना योजनेचा फायदा घेण्यासाठी नव्याने अर्ज भरावे लागणार आहे. त्यानंतर या अर्जांची पुर्नपडताळणी केली जाणार आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांची संख्या ६ लाख ८० हजार एवढी होती. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून १७ ऑगस्टला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना बँक खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
अर्जांची पडताळणी व योजनेच्या संनियंत्रणासाठी अशासकीय सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनूसार तालुकास्तरावर वॉर रुम तयार करण्यात आले असून याठिकाणी महसूल, जिल्हा परिषदेसह अन्य विभागाची यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींच्या अर्जात सापडल्या या त्रुटी… योजनेचा लाभ मिळण्यासाठी भरलेला अर्ज अपूर्ण असणे, आधारकार्डची एकच बाजू अपलोड करणे, माहिती अपूर्ण भरणे, बँक डिटेल्स न टाकणे, हमीपत्रावर स्वाक्षरी नाही अशा विविध त्रुटी अर्जांमध्ये आढळल्या आहेत. त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यास मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून अर्ज केला आहे आणि त्यांच्या अर्जात त्रुटी आहे अशांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. तर ज्यांनी महा-ई-सेवा केंद्रांवर किंवा अंगणवाडी सेविकांसह अन्य ठिकाणी अर्ज केले आहेत, त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर त्रुटी पूर्ततेचे मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात १७ ऑगस्टला पैसे मिळतील, अन्यथा त्यांना पुढील टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार आहे.
जिल्ह्यात तालुका निहाय पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी…
अकाले ४३ हजार ७८३, संगमनेर ८३ हजार ७८८, कोपरगाव ४१ हजार ४०३, श्रीरामपूर ४५ हजार ०१९, नेवासा ५६ हजार ०१९, शेवगाव ३६ हजार ४५५, पाथर्डी ३४ हजार ०३६, जामखेड २६ हजार ६९७, कर्जत ३६ हजार ७१९, श्रीगोंदा ४२ हजार ६१५, पारनेर ४३ हजार ७९१, राहुरी ५३ हजार २३६, राहाता ५२ हजार ५६९ आणि नगर ८० हजार ८४७ असे ६ लाख ७६ हजार ९७६ अर्ज पात्र ठरले आहेत.

