शनिवार, ०५ ऑक्टोबर
संगमनेर – चोरी गेलेले दागिने मोबाईल परत मिळतील याची कोणतीही आशा उरली नसताना संगमनेर शहर पोलिसांनी मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेले मोबाईल शोधत ते मूळ मालकांना परत करण्याची दिलासादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे.
तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे मोबाईलचा शोध घेत ते परत करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात देखील सुरू आहे.

मोबाईल गहाळ होण्याच्या तसेच चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरी जाणाऱ्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपाधीक्षकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाला दिले होते.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल मिसिंग आणि चोरीच्या प्रकरणांमध्ये मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, अपर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड यांनी चोरी गेलेले आणि हरविलेले काही मोबाईल परत मिळविण्यात यश मिळविले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने मोबाईलचा शोध घेत ते हस्तगत करून तक्रारदारांना परत केले आहे. संगमनेर शहरात फिरत असताना नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनची काळजी घ्यावी असे आवाहन देखील संगमनेर शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले.

