सोनई शहर आणि परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुली व तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
अनेक हतबल कुटुंबांनी आपल्या मुली हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या आहेत, मात्र दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणताही ठोस तपास केला जात नसल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे. या संवेदनशील प्रकरणात सोनई पोलीस स्टेशनचे अधिकारी वारंवार ‘एफआयआर’ (FIR) दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमधील असंतोष अधिकच वाढला आहे.
मुली गायब होण्याच्या या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात पालकांमध्ये कमालीचे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची तपासाची गती अत्यंत मंद असून प्रशासन या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक संघटना आणि संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ जागे होऊन विशेष तपास पथके नियुक्त करावीत, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करावी आणि संशयित व्यक्तींवर कडक पाळत ठेवावी अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने यावर तातडीने पावले न उचलल्यास मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची भीती व्यक्त होत असून, “सामान्य जनतेच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन नेमके झोपेत आहे की काय?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.