बाबरी मशीद पाडण्याचा विषय असो, की राम मंदिर उभारण्याचा. या दोन्ही विषयांमध्ये शक्य झालं तिथे पैशांवर हात मारण्याचा प्रकार अत्यंत खुबीने पार पाडला गेला आहे. चंपतराय बन्सल नावाच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाने राम मंदिराला पुरतं बदनाम करून टाकलंच. शिवाय रामाच्या नावाचं सोंग घेऊन धर्माच्या नावाने उत्तम ढोंग करू शकतो, असं उसने जगाला दाखवून दिलं आहे. प्रचंड माया जमवलेला हा चंपतराय म्हणतोय, “माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही… माझ्या मागे लागलात तर मी भल्याभल्यांना आडवं करेन,” असं धमकावत त्याने भाजपबरोबरच आरएसएसच्या नेत्यांनाही घेरलंय.
कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा ज्याच्यावर आरोप आहे, अशी व्यक्ती थेट आव्हान देऊ शकते, हे म्हणजे ‘सबकी उंगली घी में’ असा प्रकार म्हणता येईल. या प्रकरणात चंपतराय हा एकच नाही; सत्तेतील भलेभले आणि सत्तेच्या पाठीमागे आशीर्वाद असलेल्या संघीय ढेंडांचे या लुटीत हात माखले आहेत, हे उघड आहे. हिंदू धर्माच्या अस्मितेला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात इतर धर्मीयांचा अधिकार काय, असं विचारणाऱ्या हिंदू धर्माच्या पायिकांनी सनातनी धर्माचे संस्कार मातीमोल केले आहेत.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी हाती घेतलेल्या राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर पूर्ण होईपर्यंत लूटमार झालीच. आता रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटण्याचा पद्धतशीर कट रचला गेला आहे. याने एकट्या राम मंदिराची वा मंदिर विश्वस्त मंडळाचीच बदनामी झाली नाही, तर ज्या धर्माच्या नावाने मंदिरासाठी बाजार केला गेला, त्या हिंदू धर्माचीही जगभर छी-थू झाली आहे. स्वतःला राम मंदिराचे पायिक समजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
खरं तर आता हे प्रकरण केवळ आत्मपरीक्षण करून थांबणार नाही. कायद्याने जे जे दोषी आहेत, अशा सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. देशाची सत्ता चालवताना खोट्याचं खरं करता आलं, तसं राम मंदिराच्या चोरी प्रकरणात खोट्याचं खरं करण्याचा प्रयत्न झाला, पण तो फोल ठरला. या चोरी प्रकरणात आता किती जणांना फसवणार, असा सवाल हिंदू धर्मातले रामभक्त उघडपणे विचारू लागले आहेत; ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी. हा त्यांना घटनेने आणि धर्माने अधर्माशी लढण्यासाठी दिलेला अधिकार होय. यामुळे ज्यांनी मंदिराला विरोध केला, ज्यांनी मंदिर कोषातील भ्रष्टाचारावर जाब विचारला, त्यांनाही आता हिशोब विचारता येईल. भक्तांनी कितीही आटापिटा केला तरी त्याचा उपयोग नाही. “तुम्ही कोण?” असा विचारण्याचा अधिकार राम मंदिराच्या नावाने बाजार करणाऱ्यांना नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे.
बाबरी मशीद पाडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘राम मंदिर वही बनायेंगे’ या आंदोलनात लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंगल आणि मुरली मनोहर जोशी यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनापासूनच लूटमारीचे धंदे सुरू होते. या आंदोलनासाठी देशभरातून १४०० कोटी रुपये जमा करण्यात आले. हा पैसा गेला कुठे, त्याचा हिशोब कुठे आहे, असं निधी देणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे उघडपणे विचारू लागले आहेत. मंदिरात वावरणाऱ्यांनी राम मंदिराला अक्षरशः भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला.
राम मंदिराच्या मार्गात राम गोपालदास महाराज यांचं मोठं मंदिर होतं. या मंदिराचा चंपतने बळजबरीने ताबा घेतला आणि पुजाऱ्याच्या हातात ७ लाख रुपये टेकवून ही मालमत्ता ५ कोटी ८० लाख रुपयांत कब्जात घेतली. याविरोधात दावे झाले, तक्रारी झाल्या; पण चंपतचं काहीही वाकडं झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी सलगी असल्याने चंपतराय बन्सलच खरा ठरला. राम गोपालदास महाराज यांचं हे मंदिर असं सहज कब्जात आल्यावर चंपतचा धीर बळावला आणि त्याने चक्क राम मंदिरालाच घेरलं.
अयोध्येत ‘राम दरबार’ नावाची वास्तू आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांचा दरबार भरायचा. या दरबारातील पंचधातूंची भांडी, सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याचा पत्रा लावलेला पलंग, चांदीचे आसन अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती चंपतराय याने गायब केली. रामभक्त असलेले हरिशंकर सफारीवाले यांनी हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोचवलं खरं, पण साधी तक्रारही या चोरीबाबत घेण्यात आली नाही. चोरीचं हे दुसरं प्रकरण. दोन ठिकाणच्या चोऱ्या सुरक्षितरित्या पचल्यावर राम मंदिर लुटणं फारसं अवघड नाही, याची चंपतला खात्रीच पटली.
पिंपरी-चिंचवडच्या सिंधी समाजाने २६ जानेवारी २०२१ रोजी अयोध्येतील राम मंदिरासाठी सुमारे २०० किलो वजनाच्या आणि २ कोटी किमतीच्या २१० चांदीच्या विटा दान केल्या होत्या. हिशोबात गडबड दिसू लागल्यावर, दान केलेल्या चांदीची पावती मिळावी म्हणून या समाजाने पाठपुरावा केला. तेव्हा दप्तरात याचा तपशीलच आढळला नाही. या विटा मुंबईतील एका प्रसिद्ध सराफाकडून खास तयार करून घेतल्याचं ‘सिंधी सेवा संगम’चे अध्यक्ष मनोहर जेठवानी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलंय. या विटा गायब झाल्याचं लक्षात येताच शिवसेनेने दान केलेल्या ४ किलो वजनाच्या चांदीची नोंद तपासली, मात्र तीही आढळली नाही. हरिशंकर यांनी हे प्रकरणही एसआयटीकडे (SIT) देण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही.
राम मंदिरात पैशांची लूटमार कशी होते, याची माहिती सीसीटीव्हीच्या फुटेजमधून बाहेर आली आणि एकच हलकल्लोळ माजला. या फुटेजमधून मोजलेल्या पैशांतून शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांची बंडलं परस्पर लंपास केली जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. इतर पैसे कोणी खोऱ्याने ताब्यात घेत असल्याचं, तर काही शौचालयात लपवत असल्याचं पाहायला मिळालं. समाजमाध्यमांवर बाहेर आलेले हे फुटेज पाहून देशभर एकच काहूर माजला.
अखेर या प्रकरणाचा तपास अंतर्गत हिशोब तपासणीस महिपाल सिंग यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्या तपासणीत मंदिराच्या रोखीतून रोज सुमारे सहा ते दहा लाख रुपये बाजूला सारले जात असल्याचा आक्षेप पुढे आला. दानात आलेलं सोनं, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तूही परस्पर लंपास झाल्याची बाब महिपाल सिंग यांनी आपल्या तपासात बाहेर आणली. मंदिरातील अर्थकोष, धर्मकोष, मुद्रकोष केव्हाच लंपास करण्यात आले. मंदिरातील रोकड मोजण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली, त्यातील नृपेंद्र मिश्र यांच्यावर तर राम मंदिर आंदोलनातील कारसेवकांवर गोळीबार केल्याचा ठपका होता. त्यांची खास बाब म्हणून वर्णी लावण्यात आली.
परमहंस ब्रह्मलीन, विश्वनाथ दास शास्त्री, राम दयाल, ब्रह्मलीन रामविलास वेदांती आणि संतोष दुबे यांच्याकडे मोजणीची जबाबदारी होती. येणारे पैसे, सोनं, चांदीच्या विटा, हिरे, मोती, जवाहीर आणि रोकड यांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये केली गेली; मात्र हे सगळेच रजिस्टर गायब आहेत! याबाबत विश्वहारी दालमिया आणि विजय सिंगल यांच्याकडे माहिती पोहोचवण्यात आली. अटलजी आणि अडवाणींना काही जण भेटले, तरी कारवाई शून्य झाली. मंदिर पुजारी महंत लालदास यांनी विरोध केला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. रोख पैशांच्या मोजणीत मोठा घपला होत असल्याचं स्टेट बँकेच्या अयोध्येतील शाखाप्रमुखाने निदर्शनास आणून देताच त्यांची बदली करण्यात आली.
संतोष दुबे हे राम जन्मभूमी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते. त्यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिर आंदोलनाचा आणि आरएसएसचा काडीचा संबंध नाही. हिंदू महासभा आणि गोरखनाथ पीठाच्या धर्मसेना प्रमुखांच्या प्रयत्नानंतर राम जन्मभूमी आंदोलनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. न्यायालयीन लढ्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मांडलेलं तत्त्व मान्य करण्यात आलं आणि राम मंदिराची उभारणी दृष्टिक्षेपात आली. मात्र आता मंदिरासाठी लढणारे बाहेर, तर लुटणारे मंदिरात, असा प्रसंग उद्भवला आहे.
राम शंकर टिन्नू उर्फ टिन्नू यादव हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात २० हजारांच्या नोकरीवर होता. इतक्याशा पगाराच्या बदल्यात त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. हा टिन्नू कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या मालमत्तेचा धनी बनला आहे. अनिल मिश्र नावाची आणखी एक हस्ती अयोध्येमध्ये हातपाय पसरून आहे. मंदिराच्या जवळच आलिशान हॉटेल त्यांनी आपल्या मुलाला बांधून दिलंय. अयोध्या म्हणजे अय्याशीचा अड्डाच बनली आहे जणू! या माणसांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने सारे संत या मंडळींना घाबरतात. याचा गैरफायदा घेत या मंडळींनी रामाला अक्षरशः लुबाडलंय.
मंदिर परिषदेतील एका ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२४ पर्यंत २२०० किलो चांदी, सव्वा किलो सोने, ४२ लाखांची रक्कम, ‘श्रीराम’ नोंद असलेल्या १२५० चांदीच्या विटा आणि पाच किलोचे हिरे… इतक्या मौल्यवान वस्तूंचं काय झालं, याचा पत्ता नाही.
चंपत राय याच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी ११ जमिनींचे व्यवहार करण्यात आले. कित्येक कोटींच्या घरात रकमा स्वाहा करण्यात आल्या. आपले सगे-सोयरे, संघाचे पदाधिकारी, मोदींच्या सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी राम मंदिराच्या पैशाला जणू पायच फुटले होते. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय, अनिल मिश्र यांच्यासह ब्रिजमोहन दास यांनी विकत घेतलेली ९२ लाख रुपये किमतीची जमीन चक्क मंदिर न्यासाने ५ कोटींत खरेदी केली! आलोक बन्सल या आपल्या नातलगाला २ कोटी ९२ लाख रुपयांना खरेदी करायला लावलेली जमीन न्यासाने चक्क २४ कोटींना खरेदी केली! या खरेदी व्यवहारात अनेकांचे हात ओले झाल्याने जो-तो चिडीचूप आहे. चंपतला सध्या ४०० पोलिसांचे संरक्षण आहे. चोरी होत असताना सुरक्षेतील हे पोलिस कुठे होते, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
प्रवीण पुरो, ज्येष्ठ पत्रकार मुंबई.





