धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत
तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी मागितली होती लाज
पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या एका तक्रारीच्या अर्जात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएसआय साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर असलेल्या मौजे वलवाडी येथील घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका फायनान्स कंपनीकडून सुमारे ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज काढून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर (वय ३६) यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ ऑगस्टला तक्रार नोंदवली होती. एसीबीने त्याच दिवशी केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. या दरम्यान पीएसआय साईनाथ तळेकर यांच्या सांगण्यावरून पोलीस शिपाई अविनाश सादरे (वय ३१) याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेढे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे व तपास अधिकारी पद्मावती कलाल यांच्या पथकाने केली आहे.
पूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत राहिलेल्या तळेकर यांच्यावर धुळ्यात ही कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.