अमोल शेलकर ९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा झाली आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याला सुरुवात झाली. महात्मा गांधींनी दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारा ठरला. ब्रिटिश सत्तेने प्रमुख नेत्यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र नेतृत्वाला तुरुंगात डांबले तरी जनतेतील स्वातंत्र्याची भावना कैद करता आली नाही. उलट हे आंदोलन सामान्य भारतीयांच्या हातात गेले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या पायाभरणीलाच हादरा बसला.
‘भारत छोडो’ आंदोलन अचानक निर्माण झालेले आंदोलन नव्हते. जवळपास दोन शतकांच्या ब्रिटिश राजवटीने भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जीवनावर मोठा परिणाम केला होता. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढत होता. स्वराज्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय जनतेची संमती न घेता भारताला युद्धात सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रोष आणखी वाढला. अखेर ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीने ‘भारत छोडो’चा ठराव मंजूर केला आणि दुसऱ्याच दिवशी देशभरात आंदोलनाची ठिणगी पडली.
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या नेत्यांना अटक करण्यात आली. ब्रिटिश सरकारला वाटले की नेतृत्वाला अटक केली की आंदोलन संपेल. परंतु भारताचा स्वातंत्र्यलढा हा केवळ काही नेत्यांचा लढा राहिलेला नव्हता. तो प्रत्येक भारतीयाच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा बनला होता. त्यामुळे विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. अरुणा आसफअली, उषा मेहता यांसारख्या महिलांनी अत्यंत धाडसाने आंदोलनाला दिशा दिली. भूमिगत चळवळी उभ्या राहिल्या. गुप्त रेडिओच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला गेला.
महाराष्ट्रातही या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडला. ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अनेकांनी तुरुंगवास भोगला, पोलिसांचा अत्याचार सहन केला आणि आपले आयुष्य स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी समर्पित केले. काही ज्ञात राहिले, तर अनेक स्वातंत्र्यसैनिक इतिहासाच्या पानांमध्ये नाव न येताही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करून गेले.
म्हणूनच ऑगस्ट क्रांती दिन हा केवळ इतिहास आठवण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्या स्वातंत्र्याच्या अर्थाचा पुनर्विचार करण्याचा दिवस आहे.
आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे राज्य नाही. आपण मतदान करतो, आपले सरकार निवडतो, आपले मत व्यक्त करतो आणि आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवू शकतो. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय राजवटीपासून मुक्तता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, न्याय मिळण्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य.
याच विचारातून संविधानाचे महत्त्व समोर येते. स्वातंत्र्यानंतर भारताने संविधान स्वीकारले आणि स्वातंत्र्याला लोकशाही, न्याय, समता आणि बंधुतेची चौकट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सदस्यांनी भारताला अशी लोकशाही व्यवस्था दिली ज्यामध्ये प्रत्येक नागरिक समान आहे. कोणत्याही व्यक्तीची किंमत त्याची जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा आर्थिक परिस्थिती यावर ठरत नाही; नागरिक म्हणून त्याला समान अधिकार मिळतात. आजच्या काळात ऑगस्ट क्रांती दिनाची हीच शिकवण अधिक महत्त्वाची आहे.
१९४२ मध्ये भारतीयांनी ब्रिटिश सत्तेला प्रश्न विचारला—‘तुम्ही भारतावर राज्य का करता?’
आज स्वतंत्र भारतात आपल्याला आपल्या सरकारला, व्यवस्थेला आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. रस्ते का झाले नाहीत? शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव का मिळत नाही? युवकांना रोजगाराच्या संधी का मिळत नाहीत? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च का वाढत आहे? विकासकामे का रखडतात? सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष का जात नाही? अशा प्रश्नांची उत्तरे मागणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे.
प्रश्न विचारणारा नागरिक हा सरकारचा शत्रू नसतो; उलट तो लोकशाही अधिक मजबूत करणारा घटक असतो. लोकशाहीमध्ये सरकार निवडण्याइतकेच महत्त्वाचे काम म्हणजे सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक तेव्हा जाब विचारणे.
आजच्या पिढीसमोर आणखी एक मोठे आव्हान आहे—खोटी माहिती आणि समाजातील वाढता द्वेष. १९४२ मध्ये स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवण्यासाठी भूमिगत रेडिओची गरज होती. आज एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे माहितीचा वापर जबाबदारीने करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अफवा पसरवण्याऐवजी सत्य तपासणे, मतभेदांचा द्वेषात बदल होऊ न देणे आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना नकार देणे हीच आजची देशभक्ती आहे.
विशेषतः तरुणांनी ऑगस्ट क्रांतीचा इतिहास केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित ठेवू नये. १९४२ मध्ये तरुणांनी आपले शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक सुख बाजूला ठेवून देशासाठी संघर्ष केला. आजच्या तरुणांनी देशाच्या भविष्यासाठी शिक्षण, रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक न्याय आणि लोकशाही या क्षेत्रांत सकारात्मक योगदान देणे गरजेचे आहे.
आजची क्रांती बंदुका किंवा हिंसाचाराची नाही. आजची क्रांती म्हणजे अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने उभे राहणे. बेरोजगारीविरुद्ध आवाज उठवणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उभे राहणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज देणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे आणि लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य जपणे—हीच आधुनिक भारतातील क्रांती आहे.
१९४२ मध्ये एकतेच्या शक्तीने ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले. आजही देशाला एकतेचीच गरज आहे. धर्म, जात, भाषा, पक्ष आणि विचारधारा वेगळी असली तरी संविधान आणि भारत ही आपली समान ओळख आहे. मतभेद असणे हा लोकशाहीचा स्वाभाविक भाग आहे; परंतु मतभेदांचे रूपांतर वैरात होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
ऑगस्ट क्रांती दिन आपल्याला सांगतो की, स्वातंत्र्य मिळवणे ही एका पिढीची जबाबदारी होती; पण ते स्वातंत्र्य जपणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे.
आज ९ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करताना स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे—ज्या भारतासाठी हजारो लोकांनी तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या आणि प्राणांचे बलिदान दिले, त्या भारताच्या लोकशाही मूल्यांचे आपण किती प्रामाणिकपणे रक्षण करतो?
स्वातंत्र्यसैनिकांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल आज आपल्या हातात आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत अधिक प्रकाशमान करून पोहोचवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
१९४२ मध्ये घोषणा होती—‘भारत छोडो!’
आजची घोषणा असली पाहिजे—अन्याय छोडो, द्वेष छोडो, भ्रष्टाचार छोडो आणि संविधानाच्या मार्गाने लोकशाही मजबूत करा! ऑगस्ट क्रांतीच्या त्या महान लढ्याला आणि ज्ञात-अज्ञात सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन. जय हिंद! जय संविधान!