मंगळवार, ०८ ऑक्टोंबर
संगमनेर – रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्त्राईल संघर्ष या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थिती अस्थिर झाली असतानाही भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र आहे. सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला.


संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रेरणा कार्यक्रमात कडलग ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालचंद्र भावे, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, प्रा. राजू शेख उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. नयना पंजे यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला.
कडलग म्हणाले, सद्यस्थितीत जागतिक परिस्थिती अतिशय अस्थिर व युद्धजन्य आहे. मात्र जगाला शांतता हवी आहे. भविष्यात युद्धविराम होऊन अर्थव्यवस्था जोरदार घोडदौड करेल. भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ८ प्रतिशत वाढण्याची क्षमता गृहीत धरली तर २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची होईल. व २०४७ च्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची असेल. सद्यस्थितीत जागतिक पातळीवर एकूण पंधरा देश भारतीय रुपया या चलनाचा वापर करत आहेत ही बाब भारताचे महत्त्व अधोरेखित करते.
सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे येत्या काही कालावधीत मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स इन्स्टॉल होतील. त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये उत्पादन सुरू होईल आणि तिसऱ्या फेजमध्ये उत्पादिते निर्यात केली जातील. या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू होऊन भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.
सद्यस्थितीत भारताचे प्रज्ञावंत परदेशात जात आहे हा ओघ यामुळे बंद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कमी किमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर भावे यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बाहेर पडणारा भावी शिक्षक हा अर्थसाक्षर झाल्यास भारत देश सामर्थ्य संपन्न बनेल यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
प्रा. प्रतिमा उगले-गाडे यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना सल्लागारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते असे सांगितले. विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग व प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे यांनी उत्तरे दिली.

याप्रसंगी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सविता घुले, प्रा. मंगल आरोटे, प्रा. कविता काटे, प्रा. ज्योती मेस्त्री, प्रा. संजय खेमनर, प्रा. चंद्रकला सापनर, प्रा. कविता भोकनळ, प्रा. सूवर्णा चौधरी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विलास पांढरे यांनी तर आभार प्रा. राजु शेख यांनी मानले.

