शुक्रवार ०६ डिसेंबर – अकोले
माजी मंत्री, आदिवासींचे नेते, भाजपा नेते मधुकरराव पिचड यांचे वयाचे ८३ व्या वर्षी नाशिक येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून बेनस्ट्रोकमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी चार वाजता राजुर (अकोले) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पिचड यांच्या निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.
आदिवासी कुटुंबात जन्म – मधुकरराव पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीएएलएलबी करुन वकिलीच शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पिचड यांची १९७२ ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. १९७२ ते १९८० या काळात ते पंचायत समितीचे सभापती होते. १९८० ते २००९ असे सलग सात वेळा आमदार झाले. यादरम्यान त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती. १९७६ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संघाची स्थापना केली तर १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.
विरोधी पक्षनेते पदही सांभाळले – १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक सदस्य तसेच प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ धुरा सांभाळली. त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला.
आदिवासी विकास सह विविध खात्यांचे मंत्री राहिले – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९८० च्या विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते त्यानंतर सातत्याने त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान २५ जून १९९१ रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री संधी मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. त्यानंतर पुन्हा ६ मार्च १९९३ रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय , प्रवास विकास मंत्रालय आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी देण्यात आली.
राष्ट्रवादीकडून आमदार – काँग्रेसकडून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा निवडून आले.१९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला. २००४ मध्ये सहाव्यांदा त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुन्हा २००९ च्या निवडणुकीत सातव्यांदा त्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या काळात देखील ते मंत्री राहिले.
निळवंडेच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका – सातत्याने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मतदारसंघातील विकास कामांना मोठी चालना दिली. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतः ऐवजी मुलाला संधी देत या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यात मोठी भूमिका बजावली.

