बुधवार, २५ डिसेंबर
संगमनेर नगर परिषदेने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोघा प्लास्टिक विक्रेत्यांवर छापे टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लास्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात होती.
एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मात्र या पिशव्यांचे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत होता. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील बड्या प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. अखेरीस शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात पालिकेला यश आले आहे.
मंगळवारी दुपारी कोकरे यांचे नेतृत्वाखाली शहरातील पंजाबी कॉलनीत असलेल्या साईराज ट्रेडर्स या दुकानावर आणि परदेशपुरा भागात असलेल्या अरुण गवंडी यांच्या गोडाऊनवर राजेश गुंजाळ, प्रल्हाद देवरे, साजिद पटेल, प्रदीप मावळकर, अमजद पठाण, सतीश बुरुंगुले आदींच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत पथकाने सिंगल वापरासाठीच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, ग्लास, डिश आदी वस्तूंचा सुमारे दीड टन साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही व्यापाऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
कोकरे यांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच शहरात स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण तसेच सिंगल यूज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिकच्या संदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. प्लॅस्टिक वस्तूच्या वापरावर, साठा करण्यावर बंदी घातलेली असताना देखील काही व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे या बंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.





