शुक्रवार २७ डिसेंबर
संगमनेर – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालय त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, प्रा. बाबा खरात, डॉ. सुचित गांधी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
श्रद्धांजली अर्पण करताना थोरात म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा दिली. मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करताना त्यांनी जागतिक मंदीतून भारताला बाहेर काढले. अत्यंत सुस्वभावी, सुसंस्कृत व उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी कायम संयमाने काम केले.
पंतप्रधान म्हणून काम करताना यूपीए सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी गोरगरीब व सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानून अत्यंत महत्त्वाचा अन्नसुरक्षा कायदा आणला. जीवनदायी आरोग्य योजना राबवली. शिक्षणाचा मूलभूत अधिकार, माहितीचा अधिकार याबरोबर रोजगार हमीचा कायदा देश पातळीवर राबवला.
ते हुशार अर्थतज्ञ, दूरदृष्टी असलेले देशभक्त होते. देशासाठी अत्यंत दूरदृष्टीतून अनेक निर्णय त्यांनी घेतले. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे याचे कारण म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांनी घातलेला अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, यावेळी ते स्वतः शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री व त्यावेळी मी कृषी मंत्री होतो. शेतकऱ्यांची नियोजित बैठक होती मात्र पावसामुळे ती त्यांनी यवतमाळच्या विमानतळावर बैठक घेतली ती संस्मरणीय राहील. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने सर्व शेतकऱ्यांशी साधलेला संवाद, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना, शेती हमीभाव याबाबत केलेले मार्गदर्शन हे कायम संस्मरणीय ठरणारे आहे.
एक उत्तम प्रशासक आणि कुशल अर्थतज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे महत्त्व असून अनेक देश त्यांचे आर्थिक सल्ले घ्यायचे. त्यांच्या निधनाने देशाचा महान सुपुत्र हरवला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार तांबे म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक अर्थतज्ञ होते. खुली अर्थव्यवस्था स्वीकारून त्यांनी भारताला २००८ च्या मंदीतून बाहेर काढले. यूपीएचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारक निर्णय घेताना माहितीचा अधिकार त्यांनी जनतेला दिला. याचबरोबर देशात आयआयटीची संख्या वाढवली. अत्यंत सज्जन आणि संयमी नेतृत्व म्हणून देश त्यांच्याकडे आदराने पाहत होता. त्यांच्या निधनाने कर्तबगार पंतप्रधान आणि विश्वविख्यात अर्थतज्ञ देशाने गमावला.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, केंब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी आयुष्यभर मूल्य जपत देशहितासाठी काम केले. एक मोठे अर्थतज्ञ, कृतिशील पंतप्रधान म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कायमस्वरूपी ठसा उमटला. कर्तबगार व गोरगरिबांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे पंतप्रधान म्हणून ते देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील.

