रविवार, २९ डिसेंबर
मुंबई – बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे नाव समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली असतानाच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा केल्याने आता बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे.
दमानिया यांनी आरोपींच्या मृत्यू संदर्भात जो दावा केला त्याचे अधिकचे स्पष्टीकरण देण्याची मागणी या नोटीसद्वारे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिलेल्या नोटीसद्वारे केली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, हे पत्र बघून मला आश्चर्य वाटलं. बीडच्या एसपींना मी या संदर्भात दिलेली माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा अधिकाऱ्यांकडे दिली नसावी. त्यामुळे त्यांचे मला काल एक पत्र आले आहे, त्यात त्यांनी या संदर्भात माझ्याकडे असलेली माहिती मागविली आहे. माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच एसपींकडे पाठवली होती. संबंधितांनी मला पाठविलेले व्हॉइस मेसेज देखील मी त्यांना पाठवले होते, सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. पहिले दोन मेसेज जे डिलीट झाले आहेत त्याची देखील माहिती मी पोलिसांना दिली. पण स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


