आश्वी अपर तहसील कार्यालय वाद… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र
प्रस्तावित आश्वी अपर तहसील कार्यालयाचा चुकीच्या प्रस्तावाबाबत तीव्र नाराजी, तातडीने हा प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना देण्याची मागणी.
संगमनेर दि. ३१-
संतापाची लाट… संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये याबाबत मोठी संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही… याबाबत विविध गावांमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी मागणी केली यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
थोरात यांचे मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांना पत्र… याचसोबत थोरात यांनी आज (३१ जानेवारी) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या चुकीच्या प्रस्तावाबाबत पत्र लिहिले आहे.
काय म्हटले आहे या पत्रात… आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांनी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. या प्रस्तावामुळे जनतेची सोय होण्यापेक्षा गैरसोय अधिक होणार आहे. संगमनेर शहरालगतच्या गावांना देखील या प्रस्तावानुसार आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाला जोडले आहे. भौगोलिक परिस्थिती, महसुली मंडळाची सोय अशा कोणत्याच बाबींचा प्रस्ताव तयार करताना विचार केलेला नाही.
तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का… महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक गावांना प्रास्तावित आश्वी येथील कार्यालयात जाण्यासाठी संगमनेरवरूनच जावे लागते आहे. ही बाब अत्यंत गंभीर व प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची आहे. या प्रस्तावामुळे तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का लागला आहे.
नव्या प्रस्तावासंबंधी सूचना द्या… मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी आपल्या स्तरावरून या गंभीर बाबीची दखल घेऊन महसूल विभागाने काढलेला हा चुकीचा प्रस्ताव रद्द करून तातडीने फेरविचार करण्यासंबंधी कळवावे. महसूल प्रशासनातील ताण कमी करत असताना जनतेची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच संगमनेर तालुक्याची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक परंपरेला तसेच भौगोलिक रचनेला धक्का लागणार नाही. याबाबत ही तातडीने नवा प्रस्ताव करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी माजी मंत्री थोरात यांनी केली आहे .
