सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट – लोकनेते बाळासाहेब थोरात
लेखक नासिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार असून जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आहेत.


स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्याच्या पाण्यावर संगमनेर-अकोले तालुक्याला १९८९ मध्ये ३० टक्के हक्क मिळवून दिला. याच काळात गावोगावी दूध संस्थांची निर्मिती करून संगमनेर तालुका हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर बनवला. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचे जाळेही निर्माण केले. दुष्काळी भागाकरिता निळवंडे धरणाचा ध्यास घेतलेल्या थोरात यांना १९९९ मध्ये राज्य मंत्रिमंडळातील पहिली संधी मिळाल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेले कॅबिनेट मंत्रीपद न मागता निळवंडे धरणाकरिता पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री पद घेतल.
अगदी पहिल्याच दिवशी निळवंडेच्या कामाची फाईल हाती घेऊन अनेक दिवस रेंगाळलेले निळवंडे खर्या अर्थाने १९९९ मध्ये कार्यान्वित केले. अनेक अडचणीवर मात करुन “आधी पुनर्वसन, मग धरण”, हा आदर्शवत प्रकल्प राबविला. अनेक अडचणींवर मात करुन निळवंडे धरणाचे काम २०१२ पर्यंत पूर्ण केले. याच काळात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवताना कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेश वाडी येथील मोठ-मोठे बोगदेही मार्गी लावताना कालव्यांची कामे सुरू ठेवली.
यासोबत संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईनची ऐतिहासिक योजना पुर्ण केली. संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपालिका, कवी अनंत फंदी नाट्यगृह, कोर्ट, पंचायत समिती यांसह अनेक वैभशाली इमारती उभारल्या.
संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये प्रत्येक कामाला गती देत त्यांनी पारदर्शकपणे काम केले. शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सातत्याने विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, पाटबंधारे अशी महत्वाची खाते भूषवताना या खात्यांना लोकाभिमुख व पारदर्शक बनवले. त्यांच्या कामाचा आवाका मोठा असल्याने पक्षाला मोठा जनाधार मिळवून दिला. काँग्रेस पक्षाची प्रामाणिकता व एकनिष्ठता यासंह सर्व कामांची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने कायम त्यांच्यावर जबाबदारी दिल्या. त्यांनीही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
पुढे पक्षाला उभारी देण्याबरोबर विविध निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची पीछेहाट झाली. अशातच अनेक जण पक्षांतर करू लागले. आणि या अडचणीच्या काळात काँग्रेस अध्यक्षांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. स्वातंत्र्यसैनिकांचे चिरंजीव असलेले बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी स्वीकारली. अडचणीत असताना पळायचे नसते तर लढायचे असते हे सांगून सर्व काँग्रेसजनांना प्रोत्साहित केले.
पक्षाला पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढले आणि विधानसभेमध्ये काँग्रेसचे दमदार आगमन झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी होवून राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे मंत्री अशी दोन्ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली .
२०२० मध्ये कोरोना संकटाने जगासह भारत देश ठप्प झाला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे स्थलांतर होवू लागले. अशा अडचणीच्या काळात कोरोनाचा सामना करतांना दररोज १८ तास काम करुन थोरात यांनी शर्थीने महसूल विभाग व प्रशासनाचे नेतृत्व केले. कोरोना पाठोपाठ चक्रीवादळ, अतिवृष्टी यामध्ये शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. यामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रामध्ये थोरात यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी लोकनेते थोरात यांचे नेतृत्व सर्वांसाठी आश्वासक ठरत आहे.

