
मुंबई, दि. २४ मार्च – विशेष प्रतिनिधी
संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेची उपलब्धता करून दिली. मात्र हे स्मारक अधिक भव्य आणि भव्य दिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
तांबे म्हणाले, २१ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे स्मारक अधिक भव्य आणि भव्यदिव्य ठरावे, यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.
याशिवाय या बैठकीमध्ये संगमनेरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे, ही प्रदीर्घ मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांत्रिक अडचणींमुळे आरटीओ कार्यालय न देता स्वतंत्र “कॅम्प ऑफिस” मंजूर केले. मात्र, हे कॅम्प ऑफिस अद्याप कार्यान्वित झाले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हे कॅम्प ऑफिस लवकरात लवकर सुरू करावे आणि सर्व तांत्रिक अडचणी दूर करून संगमनेर व अकोले तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

रात्री जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस संगमनेर शहरातून न जाता शहराबाहेरील बाह्य वळण मार्गाने जातात, यामुळे संगमनेरकरांना रात्री-बेरात्री शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागते. रात्री ९ वाजेनंतर सर्व बसेस संगमनेर शहरातील बसस्थानकात थांबाव्यात, असा शासनाने निर्णय घेतलेला आहे. मात्र, या आदेशांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती सरनाईक यांच्याकडे करण्यात आली.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. संगमनेरच्या विकासासाठी हे सर्व निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला आहे.



