
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.
योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घारगांव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल बाबू गोडे, महादेव हांडे, आणि चालक सुरेश मुसळे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत तरुण अनोळखी होता. त्याच्या कमरेला एका मोटरसायकलची चावी होती आणि काही अंतरावर एम एच १५ एच आर ८०५२ क्रमांकाची मोटरसायकल उभी होती. त्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते.
मात्र, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तात्काळ सूत्रे फिरवत नाशिक आरटीओ कार्यालयाकडून मोटरसायकलच्या मालकाची माहिती मिळवली. त्यानंतर सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. या प्रयत्नांमुळे अवघ्या तासाभरात मृतदेहाची ओळख पटली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घारगांव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


