आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ३८ बससेवेच्या माध्यमातून संगमनेर एसटी आगाराने १० हजार भाविकांना सुरक्षित दर्शन घडवत तब्बल साडे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संगमनेर आगारातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ आणि ‘लालपरी’ या बसेसचा समावेश होता. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत या बसेसनी ३८ हजार ५०० किलोमीटरचे अंतर कापून एकूण १३६ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या विशेष सेवेचा फायदा घेत तब्बल १० हजार २९ भाविकांनी सुखकर व सुरक्षित प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेतले.
भाविकांनी या नियोजनाबद्दल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. वेळच्या वेळी बसेस उपलब्ध झाल्यामुळे आणि प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण न आल्याने यंदाची वारी अधिक सुलभ झाल्याचे मत भाविकांनी मांडले.
आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी सांगितले की, अतिरिक्त बसेस वेळेत उपलब्ध झाल्यामुळे आणि चालक, वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यामुळेच हे यश शक्य झाले. भविष्यातही संगमनेर आगारातर्फे प्रवाशांना अशीच दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.