महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर शहर आणि तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखाने आता आमदार अमोल खताळ यांच्या रडारवर आले आहेत. या गंभीर प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, या विघ्नसंतोषी प्रवृत्तींवर तातडीने अंकुश लावण्याचे आणि शहरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून अनधिकृत कत्तलखाने उध्वस्त करण्याचे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. या महत्त्वपूर्ण बैठकीला संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार खताळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना, पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांशी सौजन्याने आणि आदराने वागण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांचे वर्तन सभ्य आणि लोकाभिमुख असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील अनेक अनधिकृत कत्तलखाने उध्वस्त केले होते, याची आठवण करून देत खताळ म्हणाले की, पोलिसांनी गेल्या आठवड्यातही तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यांवर कारवाई केली आहे. यापुढेही जर शहरात अनधिकृत कत्तलखाने आढळून आले, तर संबंधित परिसरातील प्रशासन आणि नगरपालिकेने तातडीने नोटीस देऊन ते उध्वस्त करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
शहरात खुलेआम सुरू असलेला मटका, जुगार, अवैध दारू विक्री, अमली पदार्थांचा व्यापार, गुटखा आणि ऑनलाईन लॉटरी यांसारख्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही आमदार खताळ यांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिले. “अवैध धंदे चालवणारे कोणीही असोत, त्यांचा त्वरित बंदोबस्त करा. या अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा इतर पाठबळ दिले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शहराबरोबरच तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी चालणारे पत्त्यांचे क्लब आणि बेकायदेशीर चक्री व ऑनलाईन लॉटरी अड्डे उद्ध्वस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आमदार खताळ यांच्या या कठोर भूमिकेमुळे संगमनेरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर लगाम लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गुन्ह्यांचा घेतला आढावा… आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांकडून घरफोडी, चोऱ्या आणि चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची आत्तापर्यंतची आकडेवारी आणि त्यापैकी किती गुन्हे उघडकीस आले आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
प्रसंगी गुन्हेगारांची धिंड काढा… अकोले नाका येथे काही दिवसांपूर्वी अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत खताळ म्हणाले, “या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. हे गुन्हेगार पुन्हा असे कृत्य करणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि गरज पडल्यास त्यांची गावातून धिंड काढावी,” अशा सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
कत्तलखाना चालक, मालकांवर मकोकाची कारवाई करा… ज्या कत्तलखान्याच्या चालक आणि मालकांवर वारंवार गुन्हे दाखल झाले आहेत आणि ज्यांच्यावर अनेकदा कारवाया करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कारवाई करून त्यांना तडीपार करण्याच्या सूचना आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.


