
परंतु, हे भक्तांना सांगायचे कोणी? ते मोदींच्या इतक्या प्रेमात आहेत की, मोदींनी काहीही केले तरी त्यांना ते योग्यच वाटते. मोदींनी सांगायचे आणि यांनी ते तंतोतंत पाळायचे, हा प्रघात या भक्तांनी पाळला आहे. भक्तांच्या असल्या डोळेझाकीची समाजमाध्यमांवर जी काही रेवडी उडवली जाते, ती पाहता स्वतः मोदींनी त्यांना आवरायला हवे. मात्र, त्यांनाच हे हवे असते. ते स्वतःच आपली तारीफ करत असतात. यामुळे भक्तांपुढे सध्या एकच काम शिल्लक आहे. आपण वयस्क झालो तरी असले नियम आपल्यासाठी नसतात, हे त्यांनी देशाला दाखवून दिलेच आहे. आपला विक्रम कोणी मोडू नये, अशी त्यांची धारणा आहे. असा कारभार नेहरूंनी केला असता तर?
नेहरूंचा पंतप्रधानपदाचा काळ हा किती खडतर होता, याची जाणीव ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही त्यांना कळणार नाही. लोकशाही प्रणालीत कोणी प्रश्न विचारत असेल, तर त्याच्या उत्तराची अपेक्षा ठेवणाऱ्यांनी स्वतः उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे. नेहरूंनी जे केले तो त्यांच्या मनाचा मोठेपणा होताच, पण देश पुढे गेला पाहिजे ही दूरदृष्टीही होती. ज्यांच्याकडे आत्मीयतेचा अभाव आहे, ते काहीही न करता केवळ ढोल बडवत आहेत.
नेहरूंसाठी या संस्था म्हणजे देशाची मंदिरे होती. हीच मंदिरे देशाचे कल्याण करतील यावर त्यांचा विश्वास होता. मात्र, तो विश्वास मोदींनी टिकवू दिला नाही. या मंदिरांची त्यांनी वासलात लावली. या संस्था दोन अब्जाधीशांच्या ताब्यात देऊन देशाला खाईत टाकले. शक्य होईल तिथे नेहरूंना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे जावे तिथे नेहरूंच्या नावाने खडे फोडण्याचे काम यथोचित पार पाडले जात आहे. इतकेच काय, नेहरू सर्वश्रेष्ठ नव्हते हे दर्शवण्यासाठी त्यांनी वल्लभभाई पटेलांच्या नावाचा वापर केला. “…तर पटेल पंतप्रधान झाले असते” असल्या चर्चा घडवून आणल्या. नेहरूंचे मॉर्फ केलेले फोटो पसरवून त्यांची इतकी बदनामी केली की, त्याची तुलनाच करता येणार नाही. नेहरूंना इतके पाण्यात पाहणाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक राहोच, त्यांची निंदानालस्ती करण्यातच आनंद मिळतो. आज सुरू असलेला उत्सव हा त्यातलाच एक प्रकार होय. नेहरूंची बरोबरी करण्याची पात्रता नसलेले, मोदींच्या नावावरील निर्णयांची जंत्री दाखवताना जराही लाज बाळगत नाहीत. प्रत्यक्षात एकाही निर्णयाचे फलित देशाला मिळाले नाही.
ज्या देशाच्या शिक्षणाला नेहरूंनी सांस्कृतिक पाया म्हणून संबोधले, त्या शिक्षणाची दारे आज बंद होऊ पाहत आहेत. देशातील लाखांहून अधिक शाळांना टाळे लागले आहे. ‘नीट’च्या (NEET) फुटक्या पेपरने शिक्षण विभागाची लक्तरे जगभर वेशीवर टांगली आहेत. नेहरूंच्या काळात हे झाले असते तर शिक्षणमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला गेला असता; किंबहुना तो दाखवण्याची गरजच पडली नसती. जिथे नैतिकता असते, तिथे जबाबदारीची जाणीवही असते. या जबाबदारीपासून च्युत झालेला माणूस स्वतःच दूर व्हायचा. इथे मात्र सगळेच अलबेल आहे, कोणीही जबाबदारी घेण्याच्या भानगडीत पडत नाही.
‘ऑपरेशन सिंधूर’च्या नावाने ढोल पिटणाऱ्यांना पुलवामाचा हल्ला कोणी घडवून आणला, हा प्रश्न विचारावासा वाटत नाही. “पाकिस्तानबरोबरचे युद्ध मी थांबवले” असे कित्येकदा जाहीर करणाऱ्या ट्रम्प यांना जाब विचारावा, असे पंतप्रधानांना का वाटू नये? आम्ही व्यवहार कोणाबरोबर करावेत हे सांगणाऱ्या अमेरिकेपुढे इतके लाचारीचे जगणे नेहरूंच्या काळात स्वीकारले असते, तर या लोकांनी काय केले असते? हरमुजच्या सामुद्रधुनीत भारतीय तेलवाहू जहाजावर हल्ला करून तिघा भारतीयांचे प्राण घेणाऱ्या अमेरिकेचा साधा निषेध करावासा या सरकारला वाटू नये?