Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 14, 2026No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला आहे. एखाद्या व्यक्तीने अधिक काळ कार्यभार सांभाळला म्हणून त्याचे कौतुक करायला कोणाची ना नाही. यासाठी त्याच्या नावावर कामेही जमा असावीत. निमित्तमात्र आणि हौसमौज म्हणून असले कार्यक्रम होतच असतात, तसे या उत्सवाचे व्हायला नको. दुर्दैवाने त्यामागे असलेला कुटील डाव पाहिला की, या उत्सवाचा उबग आल्याशिवाय राहत नाही. मोदींनी अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळले असे दाखवताना ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहून किती महान होते, हे पुढे आणण्याचा पद्धतशीर आटापिटा सुरू आहे.

कोणाचा कार्यकाळ किती, याहून त्याचा कार्यकाळ ‘कसा’ होता, याची मोजदाद करायची असते. पण आजकाल त्याचा विचार करण्याचा मोठेपणा कोणाकडेच नाही. नेहरू हे मोदींपेक्षा कमजोर पंतप्रधान असल्याचे दाखवण्यामागे सत्ताधारी लागले आहेत. याकरता आपलाच बडेजावपणा आणि ओवाळण्या असले एकाहून एक उपक्रम सुरू आहेत. मोदी यांचा कार्यकाळ आणि नेहरूंचा कार्यकाळ याची खरी तर चर्चा करणेही वायफळपणाचे आहे. आखलेल्या रांगोळीवर रेघोट्या ओढण्यासारखे हे होय. कोणीही कितीही बाता मारल्या तरी मोदी आणि नेहरू यांची बरोबरी करणे शक्यतेबाहेरचे आहे.

परंतु, हे भक्तांना सांगायचे कोणी? ते मोदींच्या इतक्या प्रेमात आहेत की, मोदींनी काहीही केले तरी त्यांना ते योग्यच वाटते. मोदींनी सांगायचे आणि यांनी ते तंतोतंत पाळायचे, हा प्रघात या भक्तांनी पाळला आहे. भक्तांच्या असल्या डोळेझाकीची समाजमाध्यमांवर जी काही रेवडी उडवली जाते, ती पाहता स्वतः मोदींनी त्यांना आवरायला हवे. मात्र, त्यांनाच हे हवे असते. ते स्वतःच आपली तारीफ करत असतात. यामुळे भक्तांपुढे सध्या एकच काम शिल्लक आहे. आपण वयस्क झालो तरी असले नियम आपल्यासाठी नसतात, हे त्यांनी देशाला दाखवून दिलेच आहे. आपला विक्रम कोणी मोडू नये, अशी त्यांची धारणा आहे. असा कारभार नेहरूंनी केला असता तर?

मोदींचे हे कारभारी मोदींच्या कार्यकाळाचा उल्लेख करतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, या काळात मोदींनी केले काय, याची चर्चा त्यांना नकोशी वाटते. कार्यकाळ कमी असला तरी चालेल, पण जो मिळाला त्या काळात सर्वाधिक काम केल्याचे दाखले देता आले पाहिजेत; यासाठी विक्रमी कालावधीची आवश्यकता नसते. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नेहरूंना हरवण्याच्या नावाने सोहळे करताना, ‘नेहरूंच्या कारभाराची आपण बरोबरी तरी करू शकतो का?’ याचा विचार करायला हवा होता. भक्त वाहवत जातात म्हणून नेत्याने इतके बेफिकीर होऊ नये.

नेहरूंचा पंतप्रधानपदाचा काळ हा किती खडतर होता, याची जाणीव ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही त्यांना कळणार नाही. लोकशाही प्रणालीत कोणी प्रश्न विचारत असेल, तर त्याच्या उत्तराची अपेक्षा ठेवणाऱ्यांनी स्वतः उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे. नेहरूंनी जे केले तो त्यांच्या मनाचा मोठेपणा होताच, पण देश पुढे गेला पाहिजे ही दूरदृष्टीही होती. ज्यांच्याकडे आत्मीयतेचा अभाव आहे, ते काहीही न करता केवळ ढोल बडवत आहेत.

एक नव्हे तर अनेक संस्थांची पायाभरणी ज्या नेहरूंच्या नावावर नोंदली गेली, त्याच नेहरूंना “तुम्ही काय केले?” असा प्रश्न विचारणाऱ्यांचे डोकं ठिकाणावर नाही, असेच म्हणावे लागेल. ब्रिटिशांनी पोखरलेला देश चालवायचा कसा, असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नेहरूंनी देशवासीयांना कष्ट आणि मेहनतीचा मंत्र दिला. साऱ्या देशाने त्यांच्या या प्रयत्नांना तितक्याच प्रामाणिकपणे साथ दिली. नेहरूंच्या जागी मोदी असते तर त्यांना हे शक्य झाले असते का? या प्रश्नाचे उत्तर आज देशाच्या दिसत असलेल्या अवस्थेत आहे. नेहरूंनी उभा केलेला देश सांभाळण्याचा प्रयत्न याआधीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या परीने केला. किमान आपल्या कारकिर्दीला डाग लागणार नाही, असे निर्णय तरी त्यांनी घेतले. मोदींनी मात्र कळस केला. ज्या संस्थांनी देशाला रत्न बनवले, त्या संस्था दोन उद्योगपतींच्या हवाली करून देशाला कफल्लक बनवण्याचे उद्योग मोदींच्या नावावर जमा आहेत. नेहरूंनी असे केले असते तर?

नेहरूंसाठी या संस्था म्हणजे देशाची मंदिरे होती. हीच मंदिरे देशाचे कल्याण करतील यावर त्यांचा विश्वास होता. मात्र, तो विश्वास मोदींनी टिकवू दिला नाही. या मंदिरांची त्यांनी वासलात लावली. या संस्था दोन अब्जाधीशांच्या ताब्यात देऊन देशाला खाईत टाकले. शक्य होईल तिथे नेहरूंना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे जावे तिथे नेहरूंच्या नावाने खडे फोडण्याचे काम यथोचित पार पाडले जात आहे. इतकेच काय, नेहरू सर्वश्रेष्ठ नव्हते हे दर्शवण्यासाठी त्यांनी वल्लभभाई पटेलांच्या नावाचा वापर केला. “…तर पटेल पंतप्रधान झाले असते” असल्या चर्चा घडवून आणल्या. नेहरूंचे मॉर्फ केलेले फोटो पसरवून त्यांची इतकी बदनामी केली की, त्याची तुलनाच करता येणार नाही. नेहरूंना इतके पाण्यात पाहणाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक राहोच, त्यांची निंदानालस्ती करण्यातच आनंद मिळतो. आज सुरू असलेला उत्सव हा त्यातलाच एक प्रकार होय. नेहरूंची बरोबरी करण्याची पात्रता नसलेले, मोदींच्या नावावरील निर्णयांची जंत्री दाखवताना जराही लाज बाळगत नाहीत. प्रत्यक्षात एकाही निर्णयाचे फलित देशाला मिळाले नाही.

नोटबंदीचा निर्णय असो की जीएसटी लागू करण्याचा विषय असो; हरएक निर्णयाकडे संशयाने पाहिले जात आहे. निर्णय घेताना वशिलेबाजांची आणि आपल्या संस्थांची झोळी कशी भरेल, हे पाहिले गेले. कोविडसारख्या महामारीतही सरकार कसे लुटते, याचे दाखले मिळाले. मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सरकारने यासाठी जमवलेल्या पैशांचा हिशोबही दिला नाही. इलेक्टोरल बाँडच्या नावाने जमा केलेल्या पैशांची परतफेड कित्येक पटीने कामे देऊन करण्यात आली. अदानी-अंबानींची तिजोरी भरणाऱ्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या सुमारे ८०० शेतकऱ्यांचा जीव जाताना सरकारला काहीच वाटले नाही. एबस्टिन (इप्सस्टाईन) सारख्या घटना मोदींच्या काळात घडल्या. हे नेहरूंच्या काळात घडले असते तर त्यांचे जगणे मुश्कील करून टाकले असते. विरोधकांचे सरकार नेस्तनाबूत करणे, निवडणुकांमध्ये उघड मतचोरी करणे हा जणू काही केंद्रीय सत्तेला मिळालेला परवानाच! असे पंडितजींनी केले असते का?

ज्या देशाच्या शिक्षणाला नेहरूंनी सांस्कृतिक पाया म्हणून संबोधले, त्या शिक्षणाची दारे आज बंद होऊ पाहत आहेत. देशातील लाखांहून अधिक शाळांना टाळे लागले आहे. ‘नीट’च्या (NEET) फुटक्या पेपरने शिक्षण विभागाची लक्तरे जगभर वेशीवर टांगली आहेत. नेहरूंच्या काळात हे झाले असते तर शिक्षणमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला गेला असता; किंबहुना तो दाखवण्याची गरजच पडली नसती. जिथे नैतिकता असते, तिथे जबाबदारीची जाणीवही असते. या जबाबदारीपासून च्युत झालेला माणूस स्वतःच दूर व्हायचा. इथे मात्र सगळेच अलबेल आहे, कोणीही जबाबदारी घेण्याच्या भानगडीत पडत नाही.

नेहरूंनी देशाला सक्षम बनवलेच, पण इतर देशांच्या वळचणीला कधी नेले नाही. अमेरिका आणि रशिया हे बलाढ्य देशही भारताला वचकून असायचे. परंपरागत मित्र असलेल्या रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले, तेव्हाही भारताने योग्य आंतरराष्ट्रीय भूमिका घेतली होती. आज अमेरिकेतून नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील व्यक्तींना बेड्या घालून (हद्दपार करून) पाठवले जात असताना आमचे पंतप्रधान मौनी बाबा बनून बसले आहेत. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचे जगभर हसे होत आहे. कोणीही यावे आणि डोक्यात मारून जावे, अशी अवस्था राज्यकर्त्या मोदींनी देशाची करून ठेवली आहे.

‘ऑपरेशन सिंधूर’च्या नावाने ढोल पिटणाऱ्यांना पुलवामाचा हल्ला कोणी घडवून आणला, हा प्रश्न विचारावासा वाटत नाही. “पाकिस्तानबरोबरचे युद्ध मी थांबवले” असे कित्येकदा जाहीर करणाऱ्या ट्रम्प यांना जाब विचारावा, असे पंतप्रधानांना का वाटू नये? आम्ही व्यवहार कोणाबरोबर करावेत हे सांगणाऱ्या अमेरिकेपुढे इतके लाचारीचे जगणे नेहरूंच्या काळात स्वीकारले असते, तर या लोकांनी काय केले असते? हरमुजच्या सामुद्रधुनीत भारतीय तेलवाहू जहाजावर हल्ला करून तिघा भारतीयांचे प्राण घेणाऱ्या अमेरिकेचा साधा निषेध करावासा या सरकारला वाटू नये?

डॉलरच्या तुलनेत रुपया पासष्टीवर गेला तेव्हा जे शहाणपण शिकवत होते, तेच मोदींच्या काळात डॉलरने शंभरी पार केली तरी आवाक्षर काढत नाहीत. देशाची उत्पादन क्षमता आहे त्याच जागी असूनही, खोटारडी माहिती देऊन लोकांना फितूर केले जात आहे. देश चालला पाहिजे म्हणून नेहरूंनी त्यांची १९६ कोटींची मालमत्ता देशाला अर्पण करून टाकली. हे फक्त नेहरूच करू शकतात. येऱ्यागबाळ्याचे हे काम नाही आणि झोळी घेऊन फिरणाऱ्यांचे तर नाहीच नाही. नेहरूंची कारकीर्द आणि विक्रम साजरा करणाऱ्या मोदींची कारकीर्द यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक फूटपट्टी लावून मोजता येणार नाही.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 330
प्रवीण पुरो रविवार विशेष विश्लेषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

By अनंत पांगारकरJuly 31, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका…

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.