विशेष प्रतिनिधी / मुंबई
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (28 एप्रिल) जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये एकमुखी ठराव करत गेल्या सोमवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी निषेध प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सरकार आणि विरोधकांनी एकमताने मंजूर केला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावाद्वारे पाठिंबा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे.
विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी विशेष अधिवेशानात तीन पानांचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताना त्यांनी म्हटलं की, अशी दहशतवादी कृत्यं काश्मिरीयतच्या नीतिमत्तेवर, आपल्या संविधानात असलेल्या मूल्यांवर, जम्मू-काश्मीर आणि आपल्या देशाचं दीर्घकाळ वैशिष्ट्य असलेल्या एकता, शांती आणि सौहार्दाच्या भावनेवर थेट हल्ला आहेत. या हल्ल्याने पहिल्यांदाच जम्मूतील कठुआपासून काश्मीरमधील कुपवाडापर्यंतच्या लोकांना एकत्र आणलं आहे. हे लक्षात घेऊन, सभागृह पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत पूर्ण एकता दर्शविते.

उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी म्हटलं की, पर्यटकांना वाचवण्यासाठी शौर्याने आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या सर्वोच्च बलिदानाला हे सभागृह अभिवादन करते. त्यांचं धाडस आणि निस्वार्थता काश्मीरच्या भविष्यातील पिढ्यांसाठी एक चिरस्थायी प्रेरणा ठरेल. त्यामुळे केंद्र सरकारने सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावाद्वारे पाठिंबा देण्यात येत आहे, असं सुरिंदर चौधरी यांनी म्हटलं आहे. यानंतर सरकार आणि विरोधकांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आहे.
विशेष अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने आम्हाला पोखरुन काढलं आहे. यातून मार्ग काढणं खूप अवघड आहे. मात्र या हल्ल्यानंतर मागील 26 वर्षात मी पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील लोकांना असं बाहेर पडताना कधी पाहिलं नाही. कठुआपासून सर्वत्र लोकांनी बाहेर पडत या हल्ल्याचा निषेध केला. लोकांचं अशाप्रकारे बाहेर पडणं यामध्ये आपल्या कोणाचाच हात नाही. आम्ही मृत्युमुखी पडलेल्या लोकांसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी लोकांनी मेणबत्ती पेटवली. काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आपण आता असं काहीही बोलू नये किंवा दाखवू नये, ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल, अशी विनंती अब्दुल्ला यांनी सदस्यांना केली. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या विरोधामुळे सध्या असं सकात्मक चित्र दिसू लागलं आहे, असं ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं.


