मुंबई, विशेष प्रतिनिधी –
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण तापले आहे. या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केली आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे संपादक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप माकपने केला आहे. गायकवाड यांनी वापरलेली भाषा सभ्य समाजाला न शोभणारी असून, महिलांचा अवमान करणारी आहे. एकीकडे नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तींना पाठीशी घालायचे, हा दुटप्पीपणा सरकारने सोडावा अशी टीका पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. संजय गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्या या वागण्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन न बाळगता आपले मत स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचाही माकपने तीव्र निषेध केला आहे. महाराजांनी आपली राजसत्ता समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केली होती, असे विधान करून बागेश्वर बाबांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
अशा चुकीच्या विधानांचे मुख्यमंत्री समर्थन करत आहेत का, असा सवाल उपस्थित करत या दोन्ही व्यक्तींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.






