संगमनेर तालुक्यातील पठारभागाची पाण्याची गरज भागवणारे आणि बोटा परिसरासाठी वरदान ठरणारे कोटमारा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात मुबलक जलसाठा निर्माण झाल्यामुळे बोटा, आंबीदुमाला, कुरकुटवाडी यांसह लगतच्या गावांमधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
१९९३ मध्ये उभारणी झालेल्या १५५ एमसीएफटी क्षमतेच्या या धरणावर परिसरातील शेती आणि पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात असताना निसर्गाच्या कृपेने झालेल्या चांगल्या पावसामुळे रविवारी रात्री हे धरण पूर्ण भरून वाहू लागले.
याप्रसंगी बोलताना अजय फटांगरे यांनी सांगितले की, धरण भरल्यामुळे बोटा व परिसरातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची आगामी काळातील पाण्याची चिंता आता दूर झाली आहे.
या जलपूजन सोहळ्यात महिलांनी परंपरेनुसार साडी-चोळी, नारळ आणि फुले वाहुन जलपूजन केले. या प्रसंगी पठार भाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, बोटा गावचे पोलीस पाटील शिवाजी शेळके, कुरकुटवाडीचे पोलीस पाटील भाऊ शिंदे, सरपंच नूतनताई कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई कुरकुटे, शकुंतलाताई कुरकुटे, यशवंतीताई नरवडे तसेच प्रमोद कुरकुटे, तुकाराम कुरकुटे, विश्वास कुरकुटे, राहुल कुरकुटे, निखिल कुरकुटे, दत्तात्रय शिंदे यांसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.