महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या सदाबहार गीतांनी. या गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला. सुरुवातीपासूनच कार्यक्रमाने रसिकांच्या मनाची पकड घेतली आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगतच गेला. वाद्यवृंद क्षेत्रातील दिग्गज कलावंत मिलिंद ओक यांच्या निश एंटरटेनमेंट्स या संस्थेची निर्मिती असलेला ‘अ म्युझिकल ऑन ए.आर.रहमान – स्टोरी ऑफ अ जनरेशन’ हा सुपरहिट नव्या आणि जुन्या गीतांचा संगीतमय नजराणा मालपाणी लॉन्सच्या आलिशान रंगभूमीवर सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांनी क्षणोक्षणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः डोक्यावर घेतले.
रंगमंचावरील मोठ्या एलईडी पडद्यावर रहेमान यांच्या जीवनप्रवासाची दृश्ये, सिनेक्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे अंश, चित्रपटातील गीतांची निवडक दृश्ये आणि त्या पार्श्वभूमीवर गायक-गायिकांचे सादरीकरण, त्याला दिलखेचक नृत्यांची जोड यामुळे कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली. रहेमान यांच्या ज्या गीतांनी इतिहास घडविला, त्या गीतांच्या सादरीकरणाने रसिक कानसेन तृप्त झाले.
1967 मध्ये जन्मलेला ए.एस.दिलीप कुमार पुढे ए. आर. रहमान कसा झाला, याची माहितीही रसिकांना चित्रफितीतून मिळाली. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईने अपार कष्ट करत रहेमानच्या अंगभूत गुणांना ओळखून प्रोत्साहन दिले. संगीताची जन्मजात देणगी लाभलेल्या रहेमानने छोट्या जिंगल्स बनविण्यापासून आपला प्रवास सुरू केला. हळूहळू कठीण दिवस सोपे होत गेले. या प्रवासात प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत त्यांची झालेली भेट भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यानंतर मणिरत्नम आणि रहेमान यांची जोडी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या दिग्दर्शक-संगीतकार जोड्यांपैकी एक ठरली. हा प्रवास निवेदकाने दृश्यांच्या सहाय्याने सुंदर रीतीने उलगडून दाखविला.
‘दिल से’ची सुरुवात रोजा या मूळ तमिळ चित्रपटातील ‘दिल है छोटा सा’ या गीताच्या सादरीकरणाने झाली. ये हसीं वादियाँ, ये खुला आसमाँ, मुकाबला मुकाबला, एक हो गये हम और तुम, कहना ही क्या, आजा तुझमें समा जाऊँ रे, वन्दे मातरम, छैय्या छैय्या, आवारा भँवरे, घनन घनन, आ जा रे आजा रे, सुन मितवा, ईश्वर अल्लाह, माँ तुझे सलाम, कदम कदम, रंग दे बसंती अशी सार्वकालिक श्रेष्ठ, एकाहून एक सरस गाणी तितक्याच ताकदीने सादर करण्यात आल्याने रसिकांना तृप्तीची अनुभूती मिळाली.
मणिरत्नम, स्वतः ए. आर. रहमान, हरिहरन, प्रसिद्ध बासरीवादक नवीनकुमार, सुखविंदर सिंग, शेखर कपूर, रामगोपाल वर्मा, सुभाष घई, सिमी गरेवाल, आमिर खान, अलका याज्ञिक, आशुतोष गोवारीकर, उदित नारायण, कुमार सानू या दिग्गजांनी रहमान यांच्याविषयी सांगितलेले अनुभव पडद्यावर पाहताना रसिक एकाग्र झाल्याचे दिसत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा असावा, खजिनदार वेणूगोपाल कलंत्री, सहसचिव दर्शन भंडारी, सहखजिनदार सीए शुभम राठी तसेच कार्यकारिणीचे सदस्य गिरीश मालपाणी, मधुसूदन नावंदर, राजकुमार बिहाणी, मनीष मणियार, नितेश लाहोटी, आशिष राठी, सुमित अट्टल, गौरव राठी, सचिन पलोड, प्रतीक पोफळे, ओमकार इंदाणी, पवन करवा, उमेश कासट, कल्याण कासट, गणेश लाहोटी, रोहित मणियार, सम्राट भंडारी, व्यंकटेश लाहोटी, प्रथम खटोड, सिद्धांत झंवर आणि शुभम असावा यांनी विशेष परिश्रम घेतले.