महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी बसफेऱ्या कोकणाकडे वळवण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी सरकार व एसटी प्रशासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.
कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बसेस पाठवण्यात आल्याबद्दल आक्षेप नाही; मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द करून प्रवाशांना वेठीस धरणे अयोग्य असल्याचे शेलकर यांनी स्पष्ट केले. कोकणातील नागरिक हिंदू आहेत आणि ते गणेशोत्सव साजरा करतात म्हणून तेथे गाड्या दिल्या; मग ग्रामीण महाराष्ट्रात हिंदू नाहीत का आणि येथे गणेशोत्सव नाही का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमित एसटी सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कोकणातील वाहतुकीचे नियोजन करताना संगमनेर आणि इतर ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सरकारने घेणे गरजेचे होते.
ग्रामीण जनतेला दुय्यम वागणूक देणे थांबवून तालुक्यातील एसटी बसफेऱ्या तत्काळ पूर्ववत कराव्यात, अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमोल शेलकर यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply