महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे खोटे निरोप देऊन केवळ गर्दी जमवण्यासाठी प्रशासकीय बैठकीला बोलावल्याचा आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महायुतीमधील अंतर्गत बेबनाव पालकमंत्र्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी आमदारांच्या संपर्क कार्यालयातून ही खेळी खेळली गेल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
रविवारी सुटीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यासाठी उपस्थित राहावे, असे फोन शनिवारी आमदाराच्या संपर्क कार्यालयातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले होते. या निरोपामुळे महायुतीचे अनेक पदाधिकारी मोठ्या अपेक्षेने बैठकीला हजर झाले.
मात्र, आढावा बैठक संपताच पालकमंत्री विखे पाटील हे तातडीने पुढील दौऱ्यासाठी निघून गेले. प्रत्यक्षात पालकमंत्र्यांना अशा कोणत्याही संघटनात्मक बैठकीची पूर्वकल्पनाच देण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. केवळ आढावा बैठकीत गर्दी दाखवण्यासाठी आणि महायुतीची एकजूट असल्याचा आव आणण्यासाठी आपल्याला फसवून बोलावण्यात आले, असा सूर पदाधिकाऱ्यांमध्ये उमटला.
याविषयी काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी उघडपणे बोलणे टाळले असले तरी अंतर्गत वर्तुळात मात्र यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे, रविवारी सुटीच्या दिवशी ही बैठक लावण्यात आल्याने शासकीय अधिकाऱ्यांमधूनही सुप्त नाराजी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, या टंचाई आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावर आणि नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. निवडणूक संपली असून आता विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. माणसा-माणसांमध्ये वाद लावणे आणि ठराविक कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना टार्गेट करणे आता बंद झाले पाहिजे, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांचे चांगलेच कान टोचले. पालकमंत्र्यांचा हा रोख नेमका कोणाकडे होता, यावर बैठकीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये ‘समझनेवाले को इशारा काफी है’ अशीच चर्चा रंगली होती.
@ विखे पाटील…
विधानसभा निवडणूक आता संपली आहे. संगमनेर तालुक्यात यापूर्वी जे जिरवा-जिरवीचे राजकारण केले जात होते, त्याच मुद्द्यावरून संबंधितांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता तसले राजकारण कोणीही करू नये. माणसा-माणसांमध्ये वाद लावणे आणि ठराविक लोकांना टार्गेट करण्याचे कार्यक्रम तातडीने बंद करा. जिरवा-जिरवी बाजूला ठेवून केवळ विकासकामांवर लक्ष द्या, असे टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.






