शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर दादाजी भुसे आणि आ. सत्यजीत तांबे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा; आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन
शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या विशेष बैठकीच्या नियोजनाबाबतही सविस्तर संवाद झाला.
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीत आ. तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील रखडलेल्या प्रश्नांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आणि तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान आगामी २१ मे रोजी शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या विशेष बैठकीच्या नियोजनाबाबतही सविस्तर संवाद झाला. आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या आणि त्यामुळे शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व न्याय्य मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी २५ मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी यावेळी मंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडली.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या या भूमिकेची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सामोपचाराने आणि वेळेत सोडवले जातील, असे सांगत सरकार शिक्षकांवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन नामदार भुसे यांनी यावेळी दिले. या सकारात्मक प्रतिसादामुळे आता २१ मे रोजी होणाऱ्या शिक्षण आयुक्तांच्या बैठकीकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.