विशेष प्रतिनिधी / मुंबई “देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्षचोरी केली जाऊ लागली, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागलं आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा,” असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती. या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार चरणजित सप्रा, ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड, चित्रा राणे, जयंत दिवाण आदी उपस्थित होते.
माझा अर्ज रद्द करणे हे मोठे षडयंत्र: मीनाक्षी नटराजन – यावेळी मार्गदर्शन करताना मीनाक्षी नटराजन म्हणाल्या, “माझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केला हा महत्त्वाचा प्रश्न नाही, तर माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले होते. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी तिसरा उमेदवार उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. आमच्या तक्रारीची दखलही न घेता निर्णय देण्यात आला.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन मला पुरेसा वेळ आणि संधी दिली नाही. पण झारखंडमधील एका उमेदवाराला मात्र त्याच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला; आमचे ऐकूनही घेतले नाही. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाला, लोकांनी आवाज उठवला. माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनसभा अधिक महत्त्वाची आहे.”
आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले, “मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करून केवळ नटराजन यांच्यावरच अन्याय केला असे नाही, तर लोकशाहीवरच अन्याय केला आहे. देशात आज ‘करो या मरो’ची परिस्थिती असून आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी हे दोनच विचार आहेत आणि लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे.”
तरुणांना लढाईत सहभागी करून घ्या – विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. ते म्हणाले, “मागील १२ वर्षांपासून देशातील परिस्थिती बदलली आहे, लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. सरकार विरोधकांचा आवाज दडपून टाकत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून लोकशाही वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. या लढाईत १५ ते २५ या वयोगटातील तरुण वर्गाला सहभागी करून घेतले पाहिजे. या तरुणाईची लोकसंख्या तब्बल ५४ टक्के आहे, म्हणून या लढाईत या वर्गाचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. आज इतिहासाची मोडतोड केली जात आहे, हा चुकीचा इतिहास पसरवणे रोखले पाहिजे. सोशल मीडिया ही मोठी ताकद असून तिचा अधिकाधिक वापर करा.”
ब्रिटीश राजवटीपेक्षा वाईट परिस्थिती – तुषार गांधी म्हणाले, “देशातील आजची परिस्थिती ब्रिटिश राजवटीपेक्षा वाईट आहे. सध्या वैचारिक गुलाम बनवले जात आहे, या सरकारविरोधात रस्त्यावरची मोठी लढाई लढावी लागणार आहे. सरकारविरोधात मोठा लढा उभा केला तरच सत्तेला हादरे बसतील. पण मोठा विरोधी आवाजच उठत नाही, म्हणून सरकार त्याचा फायदा उठवत आहे.”
ते पुढे म्हणाले, “संविधानाला विरोध हा काही आताच केला जात नाही, तर संविधान निर्माण होत असल्यापासूनच त्याला विरोध केला जात होता. सत्ताधारी भाजपा संविधानाला सशक्त करणाऱ्या संस्थांवरच घाला घालत आहे. या संस्था टिकल्या तरच संविधान टिकेल. सरकारच्या नाकात दम आणेल अशा आंदोलनाची आज गरज आहे.”
यावेळी उल्का महाजन आणि तिस्ता सेटलवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.