महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला आज शंभर दिवस उलटूनही आरोपी अद्याप सापडलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी तपासातून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर न आल्याने त्यांनी बुधवारी विधिमंडळात या विषयावर पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला. या संवेदनशील प्रकरणासंदर्भात आमदार तांबे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली होती.
तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींना लवकर अटक होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शंभर दिवसानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
आमदार तांबे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले…
https://x.com/i/status/2072293190280135000
आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात हा प्रश्न मांडल्यानंतर, उपसभापती सचिन अहिर यांनी या प्रकरणाची शासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाला दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार तांबे यांनी सोशल मीडियावरून माहिती देत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.