महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे वातावरण बदलण्यासाठी आणि समाजात आनंद निर्माण करण्यासाठी जुलै महिन्यात सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मोठ्यांना मदत करणे, पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, पर्यावरण जोपासणे, आजी-आजोबांशी गप्पा मारणे, आई-वडिलांना कामात मदत करणे, ज्येष्ठांना सन्मान देणे आणि आपल्या शाळा, महाविद्यालय किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे यासारख्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद निर्माण करता येतो. समाजाच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही देखील या मोहिमेचा एक भाग आहे. ही संपूर्ण संकल्पना विनापैशाची आणि विनाकष्टाची असून यासाठी केवळ चांगल्या इच्छेची गरज आहे. कृतज्ञता आणि दयाळूपणाच्या एका कृतीतून माणसांची साखळी तयार होईल, जी समाज आणि देशाच्या हॅपिनेस इंडेक्समध्ये भर घालेल. जुलै महिन्यातील शांत पाऊस आणि निसर्गाच्या हिरवाईप्रमाणेच समाजातही मानवतेची हिरवाई निर्माण करण्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरेल. या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना महिन्याच्या शेवटी ‘काइंडनेस चॅम्पियन’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या आनंदाच्या चळवळीमध्ये आजची तरुण पिढी अर्थात ‘झेड जनरेशन’ मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संकल्पनेचा प्रसार करावा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवून या अभूतपूर्व मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी शेवटी केले.