दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा: मालपाणी उद्योग समूहाच्या उपक्रमातून ३५ जोडप्यांनी बांधली जन्मगाठ
यावर्षी ३१ हिंदू आणि ४ बौद्ध जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला असून, यात १४ पदवीधर जोडप्यांचा समावेश आहे.

अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या प्रवेशद्वारापासून विवाहस्थळापर्यंत केलेली नेत्रदीपक सजावट लक्ष वेधून घेत होती. आलेल्या सात हजारांहून अधिक पाहुण्यांसाठी उत्तम भोजन व्यवस्था आणि मनोरंजनासाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुधीर तांबे यांनी मालपाणी परिवाराच्या २८ वर्षांपासूनच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या परंपरेचे कौतुक केले. आमदार अमोल खताळ यांच्यावतीने बोलताना नीलम खताळ यांनी मालपाणी समूहाच्या या उपक्रमामुळे अनेक पालकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. डॉ. जयश्री थोरात यांनी या सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मालपाणी परिवाराचे अभिनंदन केले.
या विवाह सोहळ्याची काही वैशिष्ट्ये: केवळ एका रुपयात नोंदणी, १०० स्वयंसेवकांचे योगदान, आकर्षक विवाहस्थळ, शाही मिरवणूक, वधू-वरांची निवास व्यवस्था, सेल्फी पॉईंट, वातानुकूलित मंडप, पारंपरिक पद्धतीने विवाह, प्रत्येक जोडप्याला २५ हजारांच्या संसारोपयोगी भेटवस्तू आणि रोपांची भेट.