महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी, त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, विविध विकास योजनांची घोषणा केली.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिर्डी विमानतळाच्या विस्तारित प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे विकासकामे सुरू आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली असून, महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्या दिशेने राज्यशासन काम करत आहे. गोदावरी खोऱ्यात पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून, विदर्भातील सर्वात मोठे नळगंगा-वैणगंगा प्रकल्प राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
सौरऊर्जेमध्ये राज्याने केलेली प्रगती लक्षणीय असून, सौरऊर्जेच्या वापरामध्ये आपले राज्य संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे. “शिर्डी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये संरक्षण सामग्री उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या उभारणीस सुरुवात झाली असून, अहमदनगर येथेही ६०० एकर जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी देण्यात आली आहे. उद्योग, व्यापार वाढीस लागून रोजगाराला अधिक प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.”
नुकत्याच जाहीर झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून, शिवछत्रपती पुरस्काराने चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व अधिकारी व खेळाडूंमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडल्याचे सांगत पालकमंत्री यांनी पुरस्कारप्राप्त अधिकारी व खेळाडूंचे अभिनंदन केले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींप्रती सहवेदना व्यक्त करत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण:
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यवतमाळ येथे अभिप्राय कक्ष सुरु केल्याबद्दल राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार खलील दाऊद शेख, मल्लिकार्जून कैलास बनकर, दिगंबर रावसाहेब कारखेले, गणेश रामदास चव्हाण, कृष्णा नाना कुऱ्हे, पोलीस शिपाई प्रमोद मोहनराव इंगळे यांनाही सन्मानित करण्यात आले. २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरणही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण; जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.

