महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजीनगर
समाज कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल ७४६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याने, मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हे कृत्य बेकायदा आणि अन्यायकारक आहे. या निधी वळवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिष्यवृत्ती कशाला द्यायची? वसतिगृहे कशाला चालवायची?” असा संतप्त सवाल शिरसाट यांनी केला.

“पूर्वीही माझ्या खात्यातून सात हजार कोटी रुपये वळवले गेले, याची मला कल्पनाही नव्हती. जर समाज कल्याण खात्याची गरज नसेल, किंवा निधीच द्यायचा नसेल, तर ते खाते बंद केले तरी चालेल,” असे शिरसाट म्हणाले.
असा निधी वळवणे नियमबाह्य आहे. पण अर्थ खात्याला जे वाटते तेच खरे, त्यांची मनमानी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या खात्याविषयी नाराजी व्यक्त केली. “हे कायद्यानुसार करतो आहोत, असे ते दाखवत आहेत, पण या कृतीला माझा विरोध आहे. सहन करण्याची एक मर्यादा असते. त्यापेक्षाही जास्त निधी वळवला जात असेल, तर शिष्यवृत्ती कशाला? खातेच नसेल, तरी चालेल ना,” असे तिरकस विधानही शिरसाट यांनी केले.
मार्च अखेरीस निधी वाटप करताना अर्थ खात्याने केलेल्या कपातीवर शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना फुटीच्या वेळी अजित पवार यांच्यावर टीका झाली होती, आणि आता पुन्हा अर्थ खात्यावर टीका होत आहे. या निधी कपातीवरून माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त झाल्यानंतर राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटले आहेत.

निधी कपातीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची बैठक घेण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “नियमानुसार आदिवासी विभागाला निधी द्यावाच लागतो. असा निधी वळवल्याने या खात्यावर अन्याय होईल. सरकारमधून बाहेर पडताना ज्यांच्या नावाने ओरड केली आणि नवे सरकार स्थापन केले, त्यात आता तीन पक्ष आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांच्याकडे तक्रार करण्यासाठी काही उरले नाही. जर शिरसाट अर्थ खात्यावर बोलत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी.”



