विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळं नष्ट करुन ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाले आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही युद्धबंदीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, पाकिस्तानच्या डीजीएमओने ३.३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला. चर्चेनंतर आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. जमीन, हवा आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये १२ मे रोजी डीजीएमओ स्तरावरील चर्चा होणार आहे.
इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर वाटाघाटी करण्याचा निर्णय झालेला नाही. शनिवारी एअर कमोडोर रघु आर नायर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत भारताचे सर्व हवाई तळ सुरक्षित असल्याची पुष्टी देण्यात आली आहे. एस-४०० पूर्णपणे सुरक्षित आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. रघु आर नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एक करार झाला आहे.

भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला या कराराचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारताने हा करार पूर्ण जबाबदारीने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे, असंही ते म्हणाले.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, गेल्या १२ तासांत पाकिस्तानचं खूप नुकसान झालं आहे. भारतीय सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. पाकिस्तानने अनेक स्तरावर खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. भारताने कोणत्याही मशिदीला लक्ष्य केलं नाही. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून ब्राह्मोस तळाचं नुकसान झाल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं आहे. आम्ही पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था नष्ट केली आहे. भारतीय सैन्य सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाचं नुकसान केलेलं नाही. पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांचे नुकसान झालं आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विट करत भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी लिहिलं की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदन केलं. 


