
अहिल्यानगर –
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ४ ते ७ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहावे. तसेच, मोकळं मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये.

सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी दक्षता म्हणून होर्डिंग्जच्या आजूबाजूला थांबू नका आणि योग्य ती काळजी घ्या. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास, सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावे आणि डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे, जेणेकरून जमिनीशी कमीतकमी संपर्क राहील.
धरण आणि नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाच्या किंवा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढणं टाळावं.
वादळी वारा, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळेत नियोजन करावं. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसं नियोजन केलं असेल, तर मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचं संरक्षण होईल यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळचं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.


