महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : माणसाला आयुष्याच्या प्रवासाने भाकरीची खरी किंमत शिकवली आहे. त्याच भाकरीच्या भुकेने निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नारायण सुर्वे यांच्यासारख्या थोर कवीचे साहित्य माणसाला संकटांशी लढण्याची, जगण्याची हिंमत आणि नवी शक्ती देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी केले.
संगमनेर येथील साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या भव्य ग्रंथदिंडीचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेगीतकार बाबासाहेब सौदागर, पद्मश्री रघुवीर खेडकर, प्रसिद्ध नाट्यलेखक सोमनाथ मुटकुळे, हिरालाल पगडाल, पत्रकार संदीप वाकचौरे, संस्थेचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. विवेक वाकचौरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, डॉ. अरुण गायकवाड, सुभाष सोनवणे, सुनील गोसावी, शशिकांत शिंदे आणि तुकाराम धांडे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात सरकारवर आणि व्यवस्थेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, चालू वर्ष हे कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, परंतु दुर्दैवाने शासनाला या थोर कवीचा संपूर्ण विसर पडला आहे. बहुधा सुर्वे यांचे पुरोगामी विचार सध्याच्या सरकारला पचत नसावेत. मात्र, संगमनेरकरांनी या सुवर्णक्षणाचे भान ठेवून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा विचार जागर घडवून आणला, हे कौतुकास्पद आहे. बहुजनांनी प्रस्थापित साहित्य लेखनाचे जाचक नियम मोडीत काढले आणि आयुष्यभर आई शोधण्याची भावनिक लढाई लढली.
सुर्वे यांचा जन्मच मुळात कवी म्हणून झाला व त्यांचे जगण्याचे एकमेव कारण कविता हेच होते. जगण्याशी आणि स्वतःच्या शब्दांशी बेईमानी करणाऱ्यांची कविता कधीही दर्जेदार होऊ शकत नाही. सुर्वे हे कोणत्याही ठराविक चौकटीत बसणारे कवी नव्हते. समाजाला अधिक सुजाण व समृद्ध बनवण्यासाठी कलावंतांची आणि साहित्याची नितांत गरज असते. जिथे धर्म आणि अध्यात्माचा विचार संपतो, तिथून खऱ्या कवितेचा जन्म होतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमाद्वारे सुर्वे यांच्या विचारांचा जागर होत असल्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले. उद्घाटक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यातील श्रमिक विश्वाचा वेध घेतला. ते म्हणाले की, श्रमिकांचे खडतर जीवन आणि त्यांचे दुःख साहित्यात आणण्याचे मोठे काम सुर्वे यांनी केले. त्यांनी शोषितांचा आवाज बुलंद केल्यामुळेच सामान्य श्रमिकांच्या वेदना थेट समाजाच्या केंद्रस्थानी पोहोचू शकल्या. जगातील विविध सामाजिक चळवळींना ताकद देण्याचे ऐतिहासिक कार्य साहित्याने केले आहे. श्रमकरी वर्ग लिहिता झाल्यामुळेच त्यांचे वास्तववादी जगणे साहित्यात हुबेहूब प्रतिबिंबित झाले. राजकारण्यांनी साहित्यिक आणि कलावंतांना नेहमीच आदराने जवळ केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिक सुसंस्कृत आणि संवेदनशील राहण्यास मदत झाली आहे. याप्रसंगी सिनेगीतकार बाबासाहेब सौदागर यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. महाराष्ट्राला टाळ आणि चाळाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे, असे नमूद करत त्यांनी आजच्या समाजात पुरस्कार देणारे कमी आणि तिरस्कार करणारेच अधिक झाले आहेत, अशी खंत व्यक्त केली. प्रहार सहन करण्याची ताकद असेल तरच शेवटी विजयाचा हार गळ्यात पडतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी आपला संघर्षमय जीवनप्रवास आणि लोककलेचा समृद्ध वारसा उलगडून दाखवत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार नेहा सराफ यांनी केले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ भांडगे, नितिन कोळफकर, डॉ. नीलिमा निघुते, वंदना बाचकर, प्रकाश पारखे, विजय पाटील, अशोक वरूडे, अनुराधा आहेर, आसावरी रत्नपारखी, दीपक टाक, अशोक शेटे, पुष्पाताई निऱ्हाळी आणि जयश्री शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.