महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने मुळा नदीपात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती.
शोध सुरू असताना टेकडवाडी परिसरातील मुळा नदीकाठी त्यांची चप्पल, कपडे व इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात पाठवला.
या घटनेनंतर विठाबाई यांच्या माहेरच्या आणि सासरच्या नातेवाईकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत महिलेचे वडील सीताराम साबळे (रा. चिंचाळे, ता. राहुरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी पती विकास पहिलवान घुले, नर्मदा पहिलवान घुले आणि हिरामण लक्ष्मण घुले (सर्व रा. जांबुत बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.