महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर संकट, अपुरा पाऊस, वाढलेली उष्णता आणि दुष्काळाच्या दाहकतेवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही आता प्रत्येकाची नैतिक जबाबदारी बनली आहे. या पार्श्वभूमीवर, चालू वर्षी दंडकारण्य अभियानांतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे अत्यंत जबाबदारीने संगोपन करावे. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी मानवतेची आणि ईश्वराची सर्वोत्तम सेवा ठरेल, असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दंडकारण्य अभियानाच्या विशेष नियोजन बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, सभापती शंकरराव खेमनर, सरपंच सोमनाथ गोडसे, गोरख नवले, गोरख सोनवणे, सुभाष सानप, योगेश पवार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात आणि समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ बैठकीत बोलताना डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले दंडकारण्य अभियान आज पर्यावरण संवर्धनाची एक यशस्वी लोकचळवळ बनले आहे. या अभियानांतर्गत सप्तशृंगी गडावरील १०० हेक्टर क्षेत्रावर यशस्वीपणे वृक्षारोपण करण्यात आले असून, तालुक्यातील विविध डोंगरांवर लावलेली झाडे विविध सहकारी संस्थांच्या मदतीने जगवण्यात आली आहेत. ‘एक विद्यार्थी, दोन झाडे’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवतानाच, प्रत्येक नागरिकाने वनविभाग, गावातील मोकळ्या जागा आणि आपल्या शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी केले. वनवे रोखणे आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी वाढत्या उन्हाळ्याच्या आव्हानांकडे लक्ष वेधले. यंदाचा उन्हाळा अत्यंत भयानक होता, ज्यामुळे अनेक झाडे करपली. अशा कठीण परिस्थितीतही पाणी देऊन झाडे जगवण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी अज्ञानातून किंवा खोडसाळपणाने वनवे लावले जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात झाडे जगवणे कठीण असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘बिहार पॅटर्न’ आणि रोजगाराची सुवर्णसंधी कार्यक्रमात आपले विचार मांडताना गोरख नवले यांनी सांगितले की, वनविभाग किंवा गावाच्या मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करून नरेगा (रोजगार हमी योजना) अंतर्गत गावातील महिला व तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देता येतील. ‘बिहार पॅटर्न’च्या धर्तीवर ही रोजगाराची मोठी संधी असून, सर्व सरपंचांनी व ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन गावाला समृद्ध करावे.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी वृक्ष संवर्धन ही सामूहिक जबाबदारी मानून झाडे केवळ लावू नका, तर ती जगवून मोठी करा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग पाटील घुले यांनी केले. ‘वनश्री’ पुरस्काराने मालदाड गावाचा गौरव वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या मालदाड गावाचा या बैठकीत विशेष गौरव करण्यात आला. मालदाडच्या ग्रामस्थांनी व सरपंचांनी अत्यंत तळमळीने १४ एकर क्षेत्रावर वृक्षारोपण करून शेवगा, आंबा यांसारख्या फळझाडांमधून गावाला मोठे उत्पन्न मिळवून दिले. या पर्यावरणपूरक उपक्रमातून गावामध्ये तब्बल ६० लाख रुपयांचा मोठा रोजगार निर्माण झाला. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने गावाला ‘वनश्री पुरस्कार’ प्रदान केला आहे. या यशाबद्दल सरपंच गोरख नवले यांचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.