सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ टोलनाक्याजवळ दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी येथे मुक्कामी आल्यानंतर हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी प्रशासनाला जखमींवर सर्वोत्तम आणि तातडीचे उपचार करण्याचे निर्देश दिले असून सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशीही रस्त्याकडेला झोपलेल्या एका अज्ञात फिरस्त्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली असून या प्रकरणीही पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.