संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत मागील चार ते पाच वर्षांपासून असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. या सेवा कक्षामधून आतापर्यंत तब्बल १८ हजार कामगारांची यशस्वी नोंदणी करण्यात आली असून, मागील अवघ्या एका वर्षात शिष्यवृत्ती योजनेंतर्गत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिली आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालयातून अधिकृत नोंदणी झाल्यामुळेच तालुक्यातील या गोरगरीब कामगारांना भांडे व विविध घरगुती साहित्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता स्वतंत्र सेवा कक्ष सुरू करण्यात आला. या अंतर्गत यशोधनच्या जनसेवकांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पात्र व योग्य लाभार्थ्यांची कागदपत्रे संकलित केली आणि ऑनलाइन नोंदणीची क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केली.
आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच विविध शासकीय योजनांचा लाभ आज खऱ्या आणि पात्र कामगारांपर्यंत पोहोचत आहे. या कामाच्या माध्यमातून अपघातात जखमी अथवा मृत झालेल्या ११ कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे. याशिवाय नोंदणीकृत कामगारांना विविध गृहउपयोगी साहित्य व इतर योजनांचाही मोठा लाभ मिळत असून, संगमनेर तालुक्यातील बहुतांश कामगारांनी यशोधन कार्यालयामार्फतच ही कायदेशीर नोंदणी पूर्ण केली आहे.
सध्या तालुक्यात काही नवीन लोकप्रतिनिधी आणि विशिष्ट व्यक्तींकडून या शासकीय योजनांचे व कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय कोल्हे यांनी केला. ज्या कामगारांना लाभ मिळत आहे, त्यांना जर प्रत्यक्ष विचारले की आपण नोंदणी कुठे केली किंवा तुम्हाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न केले, तर ते डोळे झाकून लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव घेतील. ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया किंवा योजनांच्या अंमलबजावणीत कवडीचेही योगदान दिले नाही, ते आता केवळ राजकीय मेळावे घेऊन भांडे वाटप करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, ही वस्तुस्थिती असून यामध्ये त्यांचे कोणतेही वैयक्तिक योगदान नाही, अशी टीका त्यांनी केली.
कामगार कल्याण आयुक्तालयाने ज्या अधिकृत कार्यालयांमार्फत किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणीची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांच्यामार्फतच या शासकीय साहित्याचे कायदेशीर वितरण व्हावे, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी यापूर्वीच प्रशासनाकडे केली होती. मात्र, संगमनेर तालुक्यामध्ये सध्या सत्तेचा गैरवापर करून केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी शासकीय साहित्यावर स्वतःचे फोटो चिटकवले जात आहेत, ही अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय बाब असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
खाजगी एजंटांची एजंटगिरी बंद; यशोधन कार्यालयातून संपूर्ण सेवा मोफत – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत तालुक्यातील असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी पूर्णपणे मोफत नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अनेक गरजू लाभार्थ्यांच्या थेट घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करण्यात आली असून, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कामगार व भगिनीला तत्परतेने सन्मानाची सेवा देण्यात आली. यशोधनच्या या पारदर्शक उपक्रमामुळे तालुक्यातील खाजगी एजंटांची एजंटगिरी पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे या शासकीय कामासाठी जर कोणी एक रुपयाचीही मागणी केली, तर कामगारांनी तातडीने यशोधन कार्यालय किंवा थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.