मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी मंत्रिमंडळासमोर राज्यातील पीक-पाणी, खते आणि बियाणे पुरवठ्याबाबत सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्याच्या जवळपास सर्वच भागांत मान्सून सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी, गेल्या वर्षीच्या १४५.८२ लाख हेक्टरच्या अंतिम पेरण्यांच्या तुलनेत हे प्रमाण सध्या केवळ सरासरी आठ टक्के आहे. काही भागांमध्ये सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील पावसाच्या वितरणाबाबतही बैठकीत माहिती देण्यात आली. रस्तोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार: १०० टक्क्यांहून अधिक पाऊस: अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), सोलापूर, सांगली आणि धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. ५० ते ७५ टक्के पाऊस: ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

२५ ते ५० टक्के पाऊस: पालघर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस: नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता रस्तोगी यांनी व्यक्त केली.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्याची माहिती दिल्याचे नमूद केले.



