मुंबई, १९ जून:
राज्यात दूध भेसळ थांबवण्यासाठी लवकरच एक नवीन कायदा लागू केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रालयात दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या नवीन कायद्यामुळे राज्यातील दूध भेसळीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीला दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, तसेच राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत दूध संघांच्या प्रतिनिधींनी राज्यात दुधासाठी समान दर असावा, तसेच ‘एक राज्य एक ब्रँड’, ‘एक जिल्हा एक दूध संघ’ आणि ‘एक गाव एक दूध संस्था’ स्थापन करण्याची मागणी केली. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सावे यांनी आश्वासन दिले.
मुंबईतील आरे स्टॉलचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दिवसातून दोन वेळा दूध संकलन करण्याच्या मागणीवर विचार केला जाईल. दूध संकलनासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांची मदत घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे सांगत महानंदद्वारे अधिकाधिक दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मंत्री सावे यांनी केली.




